breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

आता महाराष्ट्रातील साखर कारखाने ऑक्सिजन निर्मिती करणार, शरद पवारांचे आवाहन

पुणे – राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत जातेय. नियमित ६० हजारपेक्षा जास्त बाधित सापडत असून यापैकी १० ते १५ टक्के बाधितांना ऑक्सिजन द्यावा लागत आहे. परिणामी राज्यातील ऑक्सिजनच्या साठ्यात तुटवडा निर्माण  झाला असून रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि वसंतदादा शुगर इन्स्टिटूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवारांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची प्रमुख संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून राज्यातील साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून साखर कारखान्यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील सहकारी आणि खाजगी 190 कारखान्यांना पत्र पाठवण्यात आलेय. शिवाय जे कारखाने बंद आहेत त्यांनी ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना पुरवावे, असंही आवाहन करण्यात आलेलं आहे. शरद पवारांच्या सूचनेनुसार साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आली आहेत.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं पत्र जसंच्या तसं

प्रति

अध्यक्ष / कार्यकारी संचालक

विषयः कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मीती व पुरवठा करणेबाबत

महोदय,

आपणा सर्वांना माहितच आहे की सध्या कोविडच्या दुस-या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे व कोविड पेशंटला ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे. यापूर्वी प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व साखर कारखान्यांनी भरीव मदत व सहकार्य केलेले आहे.

सद्य परिस्थिती लक्षात घेता संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी असे निर्देशित केले आहे की ज्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अद्याप चालू आहे व तसेच ज्यांचे सहविजनिर्मिती व आसवणी प्रकल्प कार्यरत आहेत अशा प्रकल्पांमध्ये मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करावी व ज्या कारखान्यांचा गाळप हंगाम संपलेला आहे अशा कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी ऑक्सिजन किटचा पुरवठा रुग्णांना अथवा कोविड सेंटरला करावा. तसेच कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारावेत व त्यासाठी कारखान्यांनी सध्याची साधनसामुग्री व मनुष्यबळाचा वापर करता येईल.

ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभा करावयाचे झाल्यास त्यासाठी वाफ व वीजेची गरज भासते. साखर कारखान्यांमध्ये वाफ आणि वीज ही कारखाना चालू असताना उपलब्ध होऊ शकते. म्हणून कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारणी हाती घ्यावेत व त्याकरिता कारखान्यांना उपलब्ध साधनसामुग्री व मनुष्यबळ याचा उपयोग करता येणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्चसुध्दा कमी होईल.

सध्याची कोविडची परिस्थिती ही भयावह असून रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासत आहे. राज्य शासन व केंद्र शासन ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेतच, तथापि आपल्या सर्व साखर कारखान्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन उपलब्ध साधनसामुग्री, मनुष्यबळ व गरज भासल्यास आवश्यक ते भांडवल घालून ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. कारखान्यांना आसवणी प्रकल्पामध्ये इथेनॉल शुध्द करण्याचा आणि कार्बनडायऑक्साईड वेगळा करण्याचा अनुभव आहे. याठिकाणी फक्त ऑक्सिजन वेगळा करण्याचा प्रकल्प उभारण्याचे आहे. या संदर्भात व्हॅक्युम प्रेशर स्वींग अॅडसॉर्पशन प्रोसेसची माहिती घेऊन यापुढे त्वरीत कार्यवाही करावी, अशी नम्र विनंती आहे. या अनुषंगाने सर्व कारखाने आपल्या कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती व पुरवठा करतील याची खात्री आहे. कळावे,

आपला विश्वास,

(शिवाजीराव देशमुख)

कोरोनाच्या पहिल्या लाटेतही कारखान्यांकडून सॅनिटायझर निर्मिती

गेल्या वर्षी कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाला होता तेव्हा राज्यात सॅनिटायझरची कमतरता होती. तेव्हा राज्यातील कारखान्यांनी सॅनिटायझर निर्मिती करुन कोरोना विषाणू संसर्गाच्या लढ्यात योगदान दिलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button