नवनीत राणांच्या तक्रारीनंतर राज्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस
अमरावती |
खासदार नवनीत राणा यांनी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या प्रिव्हलेज तक्रारीची संसदीय विशेषाधिकार समितीकडून गांभीर्याने दखल घेण्यात आलेली आहे. नवनीत राणा यांच्या तक्रारीनंतर चार पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून त्यांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी आपल्याशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप करत नवनीत राणा यांनी चार पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. याची दखल घेत आता मुंबई आयुक्त, अमरावती आयुक्त, डीसीपी अधिकाऱ्यांना ६ एप्रिलला लोकसभा सचिवालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह आणि अमरावतीचे तत्कालीन पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पोलिसांनी जबरदस्तीने थांबवून अपशब्द वापरले, असा आरोप नवनीत राणांनी केला आहे.
- काय आहे नेमकं प्रकरण?
१५ नोव्हेंबर २०२० रोजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलीसांनी ताब्यात घेतलं होतं. यावेळी पोलीस वाहनात खासदारांना बसवून नेल्याने आणि मुंबईला जात असतांना जबरदस्तीने थांबवणे, सोबतच पोलिसांनी अपशब्द वापरल्याचे आरोप खासदार नवनीत राणा यांनी केले होते.
अमरावती जिल्ह्यात २०२० मध्ये प्रचंड पावसामुळे शेतीचं खूप नुकसान झालं होते. त्यामुळे शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई आणि वीजबिल ५० टक्के माफ करावं अशी मागणी राणांनी केली होती. आमदार रवी राणांनी शेतकऱ्यांना घेऊन १३ नोव्हेंबर २०२० ला अमरावती-नागपूर महामार्ग मोझरी इथं तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केलं होतं. यावेळी तिवसा इथं टायरची जाळपोळ केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. या आंदोलनामुळे आमदार रवी राणा यांच्यासह १८ शेतकऱ्यांना तिवसा पोलीसांनी अटक केली आणि न्यायालयाने २० नोव्हेंबर २०२० पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यावेळी आमदार रवी राणांनी दिवाळी न्यायालयीन कोठडीत काढली होती.