लशीपासून कुणीही वंचित राहू नये- पंतप्रधान
नवी दिल्ली |
आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता कुणीही लसीकरणाशिवाय राहणार नाही याची काळजी घेण्यात यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच ध्वनिमुद्रित करण्यात आलेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात केले आहे.लसीकरण हे करोना प्रतिबंधासाठीचे एक सुरक्षा जाळे आहे, त्यातून कुणीही बाहेर राहता कामा नये. त्याशिवाय करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मन की बात या कार्यक्रमात त्यांनी सांगितले, की सणासुदीचा काळ जवळ येत आहे आणि लोकांनी कोविड विरोधातील लढय़ाची जाणीव ठेवावी. दैनंदिन काळात टीम इंडिया अनेक विक्रम प्रस्थापित करीत आहे. अनेक उच्चांक लसीकरणात निर्माण करण्यात आले आहेत. त्याची जागतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. केवळ आपण आपल्यापुरती लस घेऊन भागणार नाही, तर कुणीही लसीकरणाच्या जाळ्यातून बाजूला राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मोदी यांनी या वेळी सांगितले, की जागतिक नदी दिन साजरा होत असून आपल्या नद्या प्रदूषण मुक्त ठेवण्याची गरज आहे. वर्षांतून एकदा ‘नदी महोत्सव’ साजरा करण्याची कल्पना त्यांनी देशवासीयांपुढे मांडली.