कितीही मारला तरी, गांधी काही मरत नसतो!
7 सप्टेंबर रोजी दक्षिणेतील कन्याकुमारी येथून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सुरू झाली. 61 व्या दिवशी नांदेडच्या देगलूरमध्ये राहुल गांधींचे आणि भारत जोडो यात्रेचं दणक्यात स्वागत झालं. भारत जोडो यात्रेने हजारपेक्षा जास्त किलोमिटरचा टप्पा पूर्ण केला आहे. प्रत्येक दिवस अधिक मजबूत! भारताचा आवाज अजूनच बुलंद होत आहे. या राष्ट्रनिर्मिती चळवळीचा एक भाग होण्यासाठी आमच्यात सामील व्हा असे आवाहन करणारे ट्वीट काँग्रेसद्वारे करण्यात आले आहे. तसेच काँग्रसकडून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे व्हिडिओ देखील शेअर केले जात आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारत जोडो यात्रेनिमित्त राहुल गांधी इंदूरमध्ये येणार आहेत. परंतु राहुल गांधी इंदूरमध्ये दाखल होण्याआधीच त्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानात धमकीचे एक निनावी पत्र सापडले आहे. त्या पत्रातून राहुल गांधींना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जुनी इंदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात हे धमकीचे पत्र मिळाले आहे.
===========================================
रस्त्याच्या दुतर्फा फुललेली गर्दी, शेतकरी कामगारांच्या आशादायी नजरा, चिमुकल्यांच्या डोळ्यात भविष्याची स्वप्नं आणि महिलांच्या मनी सुरक्षिततेची भावना… अशा सगळ्या भारलेल्या वातावरणात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा चार राज्यातून प्रवास करुन महाराष्ट्रात दाखल झालीये. राज्यात भारत जोडो यात्रा येऊन आता तीन दिवस झालेत. लोकांचाही मोठा प्रतिसाद मिळतो आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा अनेकांसाठी आशेचा किरण आहे. तशी पक्षासाठीही ती नवसंजीवनी देणारी आहे. पण तरुण कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना संधी मिळण्याऐवजी इथेही काँग्रेसचे जुणे जाणते पुढारी राहुल गांधी यांच्या पुढे-पुढे करत आहेत. आपल्या पुढच्या पिढीची सोय लावू पाहत आहेत. असो.
खरं सांगायचे झाले तर ,
तो किती थोर आहे, माहीत नाही. संशयच आज एवढा बलशाली आहे की, त्याच्यावरही भरवसा किती ठेवावा, हे अद्याप नीट कळत नाही!
पण, ज्या दर्जाचा प्रतिसाद आज त्याला मिळतो आहे, जे प्रेम तो अनुभवतो आहे, लोक जे काही वेडे होताहेत, त्याने एक गोष्ट सिद्ध झालीय.
‘गांधी’ काही मरत नाही. यात्रा ‘दांडी’ असेल वा आणखी काही. एक मात्र विसरून चालणार नाही.
लोकांना नको असते दंगल, रक्त सांडणारी.
नको असतात भेसूर माणसं, खोटं बोलणारी.
त्यांना हवं असतं प्रेम, जे मनापासून असेल
नि हवं असतं गोड जग, जे आतून खुलेल!
असं मिळू लागतं, तेव्हा लोक झुगारतात
इंद्राचा ऐरावत!
अशी खात्री पटते, तेव्हा नाकारतात
खोटे मानमरातब!!
‘त्यांच्या’ सत्तेचा सूर्य मग मावळू लागतो
बलाढ्य खुर्चीचा माजही आक्रसू लागतो
साधी माणसं मग एकवटू लागतात
एका वेड्याच्या भवताली जमू लागतात!
मग तो कोणी पप्पू असो
वा अगदी बच्चा असो!
पण यार,
तो जेव्हा सच्चा असतो ना,
तेव्हा तो उद्ध्वस्त करतो
तुमची अवघी सेना!
तुमची अवघी सत्ता!
अशाच लहान चणीच्या गांधीनं
बलाढ्य इंग्रजांना हरवलं
एका फाटक्या माणसानं
महाशक्तीला नमवलं!
इतिहास थांबत नसतो.
पुन्हा प्रकटत असतो.
कितीही मारला तरी,
गांधी काही मरत नसतो!
-सुनील आढाव,
कार्यकारी संपादक महाईन्यूज