मुख्यमंत्री केजरीवालांना भेटण्यासाठी सोलापूरचा नीलेश सायकलवर निघाला; भेटताच केली ‘ही’ विनंती
सोलापूर| महाराष्ट्र आणि सोलापूरच्या बकाल झालेल्या अवस्थेला ‘आप’शिवाय पर्याय नाही, असा सांगावा घेऊन सोलापुरातल्या एका विद्यार्थ्याने सायकलवर थेट दिल्ली गाठलीय. संगमेश्वर महाविद्यालयात बीए भाग दोनमध्ये शिकणारा निलेश संगेपांग असं या विद्यार्थ्यांचे नांव असून त्यानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्राच्या मैदानात उतरण्याची विनंती केलीय.
दिल्ली, पंजाबचा राजकीय आखाडा जिंकणाऱ्या अरविंद केजरीवालांचा नीलेश हा चाहता आहे. केजरीवाल यांच्या प्रभावामुळे दिल्ली गाठणाऱ्या नीलेशने सोलापूर ते दिल्ली असा सोळाशे किलोमीटरचा प्रवास सायकलवर केलाय. केजरीवालांनी ज्या पद्धतीने शिक्षण, आरोग्य आणि प्रशासकीय सुधारणा केल्या आहेत तीच खरी भारताच्या विकासाची दिशा आहे. ज्या सुविधा दिल्लीमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत, तशाच पद्धतीचा बदल महाराष्ट्रात व्हावा आणि ‘आप’ने महाराष्ट्रात निवडणुका लढवाव्यात ही विनंती केजरीवालांना नीलेशने केलीय. यावेळी नीलेशने केजरीवालांना सोलापुरी चादर, शेंगाचटणी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा भेट दिल्या.
गेल्या ५ एप्रिलला सोलापुरातून निघताना त्याने आई-वडिलांसोबत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे दर्शन घेवून आपला प्रवास सुरु केला. नीलेशने ज्या सायकलीवरुन सोलापूर ते दिल्ली असा प्रवास केला त्या सायकलीवर त्याने भारतीय तिरंगा झेंडा आणि आम आदमी पक्षाचा झेंडा लावला होता. मराठवाडा, खान्देश, मध्य प्रदेश, हरियाणा अन दिल्ली या राज्यातल्या जनतेने सोलापुरातून नीलेशने सुरु केलेल्या या सायकल प्रवासाचे कौतुक केले आहे. पंजाबच्या यशानंतर मुख्यमंत्री अरविंद केजारीवाल यांची तरुणांमधील लोकप्रियता प्रचंड वाढल्याचे निलेशच्या या सायकल प्रवासातून स्पष्ट झाले आहे.