पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘नेव्ही’चं बचाव कार्य सुरू
मुंबई |
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने थैमान घातल्याने पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कित्येक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, गावांना पूराने वेढा दिल्याने नागरिक अडकले आहेत. या नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय नौदलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये नेव्हीची पथक दाखल झाली असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी नेलं जात आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून नौदलाकडे मदतीची मागणी करण्यात आली होती. वेस्टर्न नेवल कमांड, मुंबईने राज्य प्रशासनास मदत पुरवण्यासाठी पूर-बचाव दल आणि हेलिकॉप्टर एकत्रित केले आहेत. वेस्टर्न नेवल कमांड, मुंबईने राज्य प्रशासनास मदत पुरवण्यासाठी पूर-बचाव दल आणि हेलिकॉप्टर पाठवले आहे.
प्रतिकुल हवामानाची परिस्थिती आणि पूर परिस्थितीने संबंधित भागांना निर्माण झालेला धोका अशा परिस्थितीतही नौदलाची एकूण सात पथकं बचाव कार्यासाठी मुंबईहून रत्नागिरी व रायगड जिल्ह्याकडे रस्ते मार्गाने कालच रवाना झालेली आहेत. पूराने वेढलेल्या भागांमध्ये अडकलेल्या नागरिकांना एअरलिफ्ट करून सुरक्षितस्थळी नेले जात आहे. मुंबई येथून आयएनएस शिक्रा युद्धनौकेवरून एक हॅलिकॉप्टर देखील आज(शुक्रवार) पहाटेच्या वेळी पोलादपूर / रायगड येथे बचावासाठी रवाना झाले आहे. नौदल पूर बचाव पथक पूर्णपणे स्वयंपूर्ण आहेत आणि रबर बोट्स, प्राथमिक उपचार पेटी, लाईफ जॅकेट्स आदी आवश्यक साहित्य देखील त्यांच्यासोबत आहे. याशिवाय नौदलाच्या पथकात स्पेशल डायव्हर्सचाही समावेश आहे. य़ाशिवाय गरज भासल्यास मुंबईत नौदलाचे आणखी अतिरिक्त बचाव पथक सज्ज आहेत.