समंथासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर नाग चैतन्यची पहिली प्रतिक्रिया
अभिनेत्री आणि पत्नी समंथा रुथ प्रभूला घटस्फोट देण्याच्या चर्चांवर पहिल्यांदाच अभिनेता नाग चैतन्यने प्रतिक्रिया दिली आहे. या प्रसिद्ध दाक्षिणात्य जोडप्याच्या विभक्त होण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहेत. ‘फिल्म कम्पॅनियन साऊथ’ला दिलेल्या मुलाखतीत नाग चैतन्य त्याच्या घटस्फोटाच्या चर्चांवर व्यक्त झाला. “सुरुवातीला, या सर्व चर्चा खूप त्रासदायक होत्या. मनोरंजनविश्व अशा चर्चांकडे का झुकतंय, असा प्रश्न पडला होता. पण नंतर मला समजलं की, आताच्या जगात एका बातमीची जागा दुसरी बातमीच घेऊ शकते. पण हे सर्व लोकांच्या डोक्यात फार काळ राहत नाही. जी खरी बातमी आहे, तीच शेवटपर्यंत टीकेल आणि या सर्व चर्चा नाहीशा होतील. टीआरपीसाठी बनवलेल्या बातम्या कालांतराने संपतील किंवा नष्ट होतील किंवा लोकांकडून विसरले जाईल. हे निरीक्षण जेव्हा मला समजलं, तेव्हा या चर्चांचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही”, असं तो म्हणाला.
खासगी आणि व्यावसायिक आयुष्य पूर्णपणे वेगळे ठेवणार असल्याचंही नाग चैतन्यने यावेळी स्पष्ट केलं. “माझ्या करिअरच्या अगदी सुरुवातीपासूनच मी माझं खासगी आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य वेगळं ठेवलंय. या दोन्हींमध्ये मी कधीच गफलत केली नाही. लहानाचं मोठं होत असताना, आईवडिलांकडे पाहून मी ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने शिकलो. आईबाबा जेव्हा घरी यायचे, तेव्हा ते घरात कामाविषयी कधीच बोलायचे नाहीत आणि जेव्हा ते कामावर असायचे, तेव्हा खासगी आयुष्याचा त्यावर कधीच परिणाम झाला नव्हता. त्यांनी खूप चांगलं संतुलन ठेवलं होतं. मलासुद्धा हेच करायचं आहे”, असं त्याने पुढे सांगितलं.
आपल्या नात्याला आणखी एक संधी देण्यासाठी समंथा आणि नाग चैतन्यने वैवाहिक सल्लागारांची मदत घेतली. मात्र हे दोघंही घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम असल्याचं म्हटलं जात आहे. पुढील दोन-तीन महिन्यांत घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिली. घटस्फोटानंतर समंथाला जवळपास ५० कोटी रुपये पोटगी म्हणून मिळणार असल्याचंही म्हटलं जात आहे.