यवतमाळमध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांची हत्या ; डॉक्टर्स, विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात ठिय्या आंदोलन
- धिष्ठात्यांचा राजीनामा
यवतमाळ |
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तृतीय वर्षांला असलेल्या विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री ९च्या सुमारास घडली. अशोक पाल, रा. ठाणे (मूळ गाव जौनपूर, उत्तर प्रदेश) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. या घटनेने वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड खळबळ उडाली असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह परीविक्षाधीन डॉक्टर्स, निवासी विद्यार्थी यांनी आक्रमक भूमिका घेऊन आरोपींच्या अटकेसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान, विद्यार्थी ठिय्या आंदोलन मागे घ्यायला तयार नसल्याने अखेर महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी सायंकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
अशोक पाल हा बुधवारी रात्री महाविद्यालय परिसरातील ग्रंथालयातून वसतिगृहाकडे जात होता. अनोळखी मारेकऱ्यांनी त्याला वाटेत अडवले व त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. तो मरण पावला असे समजून जखमी अवस्थेत त्याला तेथेच सोडून मारेकरी पळून गेले. ही बाब परिसरातील काही विद्यार्थी व नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अशोकला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. या घटनेच्या निषेधार्थ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. मारेकऱ्यांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्या, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात ठिय्या आंदोलन केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महाविद्यालयात पोहचून आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांशी चर्चा केली. मात्र आरोपींना अटक होऊन कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याच्या निर्णयावर विद्यार्थी ठाम होते. वैद्यकीय महाविद्यालयातील अनागोंदीचा यावेळी विद्यार्थ्यांनी मुर्दाबादच्या घोषणा देऊन निषेध नोंदवला. पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.