महावितरणचा काराभार, ऊर्जामंत्र्यांसमोरच विजेचा लपंडाव
मनमाड |राज्यावर आलेले भारनियमनाचे संकट दूर करण्यासाठी राज्य सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मात्र केंद्र सरकारच्या कोळसा पुरवठाबाबतच्या आडमुठ्या धोरणामुळेच हे संकट नागरिकांवर लादले गेले, असा आरोप ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी गुरुवारी मनमाड येथे केला. मात्र त्यांची प्रेस सुरू असतानाच दोनवेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने, महावितरणच्या भोंगळ काराभाराचा चक्क त्यांच्याच खात्याच्या मंत्र्यांना सामना करावा लागला.
मंत्री तनपुरे एका खासगी कार्यक्रमासाठी मनमाड येथे आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजपने भोंगा व श्लोक याचे भांडवल करण्यापेक्षा दिल्लीत जाऊन कोळसा आणावा. चढ्यादराने वीज खरेदी करून नागरिकांची भारनियमनापासून मुक्तता करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. पुढील काही दिवस भारनियमन करण्याशिवाय पर्याय नाही. राज्यमंत्री तनपुरे यांनी केंद्र सरकारसह माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळातील वीज धोरणावर कडाडून हल्ला चढवला.
भाजपच्या काळात राज्यात एक तरी वीज निर्मिती प्रकल्प आला का? असा सवाल त्यांनी या प्रेस दरम्यान उपस्थित केला. भाजपचे ज्या राज्यांमध्ये सरकार आहे, तेथेदेखील भारनियमन सुरू आहे. त्यामुळे भाजपने त्याचे भांडवल करू नये असे ते म्हणाले. मात्र तनपुरे यांची प्रेस सुरू असतानाच दोनवेळा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे फ्यूज गेला, तांत्रिक कारणामुळे वीज गेली, असे सांगून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली असली तरी या विभागाच्या भोंगळ कारभारचे मंत्र्यांसमोर वाभाडे निघाले. यावेळी राष्ट्रवादीचे दीपक गोगड, नाना शिंदे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, अक्षय देशमुख आदी उपस्थित होते.