…अन् पंजाबच्या उपमुख्यमंत्र्यांनीच दिल्या ‘मोदी जिंदाबाद’च्या घोषणा; जाणून घ्या घडलं काय
नवी दिल्ली |
पंजाबमधील फिरोजपूरमध्ये रॅलीसाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक झाल्याच्या मुद्द्यावरुन देशातील राजकारण चांगलच तापलंय. निवडणुकीच्या प्रर्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि भाजपा या मुद्द्यावरुन पंजाब काँग्रेस तसेच मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर टीका करताना दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणामध्ये राज्य सरकारकडून सविस्तर माहिती मागवली आहे. घडलेल्या घटनेसंदर्भात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी गृहमंत्रालयाने केलीय.
पंतप्रधानांच्या ताफ्यासंदर्भात घडलेल्या या घटनेवरुन भाजपाचे समर्थक आता काँग्रेसवर टीका करु लागलेत. बुधवारी भाजपाच्या अनेक समर्थकांनी मोदींचा ताफा आडवण्याच्या प्रकरणावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री ओपी सोनी यांचा ताफा अडवला. गुरुवारी (६ जानेवारी २०२२ रोजी) फिरोजपूरमध्येच हा प्रकार घडला. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना मोदी जिंदाबादच्या घोषणा देण्यास भाग पाडलं. उपमुख्यमंत्री जोपर्यंत मोदी जिंदाबादच्या घोषणा देत नाही आम्ही बाजूला होणार नाही अशी भूमिका घेतल्याने अखेर उपमुख्यमंत्र्यांनी घोषाण दिल्यानंतर ताफ्यासाठी वाट मोकळी करुन देण्यात आली.
उपमुख्यमंत्र्यांचा ताफा आडवण्याचा प्रकार घडल्यामुळे पंजाब पोलिसांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे. ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीला भाजपा समर्थकांनी वेढा घातला त्या ठिकाणी पोलीस उपस्थित होते. मात्र पोलीस नुसते उभं राहून समोरचा घटनाक्रम बघत होते असं न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. पोलिसांना आंदोलक आणि भाजपा समर्थकांना हटवण्यात पूर्णपणे अपयश आल्याचं सांगण्यात येतं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मोदींच्या सुरक्षेमध्ये कोणतीही चूक झालेली नाही असा दावा केलाय. छोट्याश्या गोष्टीमधून मोठा वाद निर्माण करण्यात आलाय असं चन्नी म्हणाले. केंद्र सरकार या प्रकरणामध्ये केवळ अफवा पसरवण्याचं काम करत असल्याचा टोलाही चन्नी यांनी लगावला आहे. पंतप्रधानांच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता असंही चन्नी म्हणाले आहेत. एका मुलाखतीमध्ये चन्नी यांनी आपण पंतप्रधानांकडे भेटीसाठी वेळ मागितल्याचं सांगितलं. तसेच पंतप्रधानांना दिर्घायुष्य मिळो यासाठी प्रार्थना करत असल्याचंही चन्नी म्हणाले.