कामगारांच्या हक्काच्या निधीवर मोदी सरकारचा डल्ला : काशिनाथ नखाते
- चिंचवड येथे कष्टकरी संघर्ष महासंघाची बैठक
पिंपरी : प्रतिनिधी
देशभरातील कष्टकरी कामगारांनी आयुष्यभर राबायचे आणि उतारवयात मदत होईल म्हणून भविष्य निर्वाह निधी जमा करायचा. मात्र मोदी सरकार आता या भविष्य निर्वाह निधीवरही डल्ला मारून त्यांच्या पैशाची लूट करणार आहे. अशी आधीसूचना काढण्यात आली आहे. ज्या कामगारांच्या खात्यावरील वर्षीक ठेव अडीच लाखाच्या पुढे आहे, त्यांच्या ठेवीवर मिळणारे व्याज कर पात्र ठरणार आहे. देशातील कष्टकरी कामगार यांच्या तुटपुंज्या निधीवर अशा प्रकारचा निर्णय घेणे म्हणजे अन्यायकारक असून कामगारांच्या हक्कावर डल्ला मारण्यासारखे असल्याचे मत कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आयोजित चिंचवड बैठकीत ते बोलत होते. वेळी उपाध्यक्ष भास्कर राठोड ,राजेश माने ,महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार ,अर्चना कांबळे, विनोद गवई, सूरज शिंदे, अर्जुन सोनवणे आदीसह कामगार उपस्थित होते .
नखाते म्हणाले की, केंद्र सरकारने अन्यायकारक कामगार कायदे आणून कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केला. उरलेसुरले कामगार आहेत त्यांचेही वाटोळे करण्याचा प्रकार दिसत आहे. देशामध्ये 15 कोटी पेक्षा अधिक खातेदार हे पीएफ भरणार आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये एक तर काम मिळत नाही. मिळाल तर टिकत नाही. वर्षानुवर्षे एखाद्या आस्थापनांमध्ये काम करून आपल्या भविष्यासाठी जो निधी जमा केलेला आहे. त्यावरच त्यांचे उतारवयात जगणे अवलंबून असते. त्यावर देखील मोदी सरकारचा डोळा आहे. कामगारांना पीएफ न मिळाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा नखाते यांनी दिला.