पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत बोलण्यासाठी उठताच विरोधी पकक्षाकडून महागाईच्या मुद्द्यावरुन गदारोळ
नवी दिल्ली: संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. 19 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला नव्या सदस्यांना शपथ देण्यात आली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या मंत्र्यांचा परिचय देण्यासाठी उभे राहिले. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी सुरु केली. सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर अवघ्या 8 मिनिटात विरोधकांनी गोंधळाला सुरु झाली. महागाईच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळालेत. काँग्रेससोबत अकाली आणि बसपाचे खासदार शेतकऱ्यांच्या मुद्दय़ावर आक्रमक झाले.
दरम्यान, पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसच्या वाढत्या किंमतींचा निषेध व्यक्त करण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार सायकलवरून संसदेत पोहोचले. विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना हे संसदेच्या परंपरेला धरुन नसल्याचं सांगत संताप व्यक्त केला. चांगल्या पंरपरा तोडल्या जात आहेत. सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या संसदेत हे वागणं योग्य नाही असं त्यांनी विरोधकांना सुनावले.
पावसाळी अधिवेशनात 2 आर्थिक विधेयकांसह एकूण 31 विधेयकं मांडली जाणार आहेत. 13 ऑगस्टपर्यंत सभागृहाचं कामकाज नियोजित आहे. काँग्रेस खासदार मनिष तिवारी लोकसभेत कृषी कायद्यांविरोधात स्थगन प्रस्ताव देणार आहेत. शेतकरी आंदोलनावरुन काँग्रेससह विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. मात्र गदारोळात सभागृहाचं कामकाज वाया जाऊ नये, असं आवाहन सत्ताधारी भाजपकडून केलं आहे.
विरोधकांनी एकच गदारोळ सुरु केल्यामुळे, लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज पहिल्याच दिवशी, पहिल्याच सत्रात दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं. तिकडे राज्यसभेचं कामकाजही 12:24 पर्यंत स्थगित करण्यात आलं.