मनसेच्या इंजिनचा ट्रॅक बदलला; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
नाशिक |महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल झालेल्या पाडव्या मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसवरही राज यांनी आरोप केले होते. राज ठाकरे यांच्या पाडव्या मेळाव्यातील भाषणानंतर त्यांनी भूमिका बदलल्याचीही टीका होत आहे. यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी मिश्किल टीका केली आहे. मनसेचा मेळावा झाला पण जाहीरसभा नेमकी भाजप की मनसेची?, असा खोचक सवाल भुजबळांनी केला आहे.
राज ठाकरे यांनी भाजपला कडवा विरोध केला आहे. त्यांनी अचानक टर्न कसा घेतला हे कळलं नाही. त्यांनी माझ्यावरही टीका केली. मी तेव्हाही मोदी सरकारविरुद्ध बोललो आहे. परंतु, ईडीने एकदा बोलावलं तर इंजिन वेगळ्याच ट्रॅकवर गेलं आहे. कोहिनूर टॉवर हालायला लागला की काय?, असा खोचक टोला छनग भुजबळ यांनी लगावला आहे. तसंच, जे असेल ते त्यांनी स्पष्ट करावं, असंही भुजबळांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही जातीय वादाची टीका केली होती. या टीकेवरही भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जातीय वाद आणि धर्मवाद कोणी वाढवला. हे शोधायला गेलं तर अवघड होईल. राज ठाकरे यांना हिंदी प्रेम कुठून आलं? बोलतात चांगल म्हणून लोकं जातात. त्यांचं वागणं लोकांना समजतं नाही. कार्यकर्त्यांना देखील दिशा समजेना. पक्षाची वाढ, आमदाराज नगरसेवक किती? याचा विचार राज ठाकरे यांनी करावा, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.
मशिदींवरील भोंगे राज्य सरकारने उतरवावे, अन्यथा मशिदीसमोरच हनुमान चालिसा म्हटले जाईल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यावरही भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागची पाच वर्षे भाजपचं सरकार होतं. त्यांचं सरकार भोंग्याबाबत कार्यवाही का करत नाही. निवडणूक आल्यामुळे धर्मवाद वाढवून लोकं वळविण्याचा प्रयत्न दिसतोय, असाही संशय भुजबळांनी व्यक्त केला आहे. तसंच, राज ठाकरे भाजपच्या जवळ नव्हे, तर भाजपचाच प्रचार करत होते. ईडीच्या नोटीसमुळे राज ठाकरे यांचा ट्रॅक बदलला, असंही भुजबळांनी म्हटलं आहे.