औरंगाबादेत मनसेला खिंडार; ४ कार्यकर्त्यांच्या हाकालपट्टीनतंर ५३ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
औरंगाबाद | टीम ऑनलाइन
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे, नाशिकसह औरंगाबादचा दौरा केला. या दौऱ्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील पक्षात अनेक घडामोडी झाल्या. जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांना पदावरून दूर केल्यानंतर आता पक्षातील इतर चार अधिकाऱ्यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. मात्र यामुळे ५३ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मनसेत नवीन जिल्हाध्यक्ष पदाची नियुक्ती होताच हे घडत असल्याचे दिसून येत आहे. कारण हे चारही पदाधिकारी दाशरथे यांच्या गटाचे असल्याचे समजते. दाशरथे यांना पदावरून दूर केल्यांनतर संदीप कुलकर्णी, चेतन शर्मा, रमेश पुरी, आणि दीपक पवार या चार पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी झाली. यानंतर ५३ स्थनिक पदाधिकाऱ्यांनी काल दुपारी पत्रकार परिषद घेऊन कुठलीही चूक नसताना या ४ पदाधिकाऱ्यांचे निलंबन होणे हे चुकीचे असल्याचे म्हटले असून, आम्ही देखील सामूहिक राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान,गटबाजीमुळे दाशरथे यांना पदावरून दूर केले. त्यांनतर त्यांच्याच गटातील इतर चार जणांवर पक्षाची बदनामी केल्याचा ठपका ठेवत या चौघांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले असल्याचे पत्रक काढण्यात आले. याचे पडसाद स्थनिक स्तरावर पहायला मिळाले. दरम्यान, यांचे सदस्यत्व रद्द केल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ ५३ पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामा दिला. या साऱ्या प्रकारामुळे मनसेत पुरता गोंधळ उडाल्यामुळे यावर आता पक्ष प्रमुख राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे पदाधिकारी आणि मनसे कार्यकृत्यांचे लक्ष लागले आहे.