मनसे आक्रमक; औरंगजेबच्या कबरीवर जाण्यास मनाई, पुरातत्त्व विभागाचा आदेश
औरंगाबाद : ज्या व्यक्तीने क्रूरता केली आशा औरंगजेबची कबर हवीच कशाला, असा सवाल करत मनसेने इशारा दिला होता. याची दखल घेत पुढील पाच दिवस औरंगजेबच्या कबरीवर कोणालाही जाण्यास मानई करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधीक्षक मीनलकुमार चावले यांनी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.
खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीवर एमआयएमचे नेते नतमस्तक झाल्यानंतर घडामोडींना वेग आला होता. राजकीय वाद देखील पाहायला मिळाला. ही कबर औरंगाबाद जिल्ह्यात हवीच कशाला, असा सवाल यापूर्वी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता, असे सांगत आता मनसेने या वादात उडी घेतली. याची दखल घेत पुढील पाच दिवस कबरीवर कोणालाही जाता येणार नसल्याचे आदेश पुरातत्व विभागाने दिले आहेत.
‘ही कबर येथे हवीच कशाला, असा प्रश्न हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विचारला होता. आता पुन्हा तोच प्रश्न मनसेकडून विचारला गेला, असे औरंगाबाद येथील कबरीच्या वादाविषयी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर म्हणाले. या कबरीकडे कोणी फिरकतच नाही. मुस्लिम लोकही जात नाहीत. नाहक चर्चा करण्यात अर्थ नाही, अशी भूमिका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली होती.
कबर खोदल्याची अफवा
खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर खोदल्याची अफवा पसरविण्यात आल्याने पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. हा विशेष बंदोबस्त नाही. पण काळजी घेतली जात असल्याचे पोलीस निरीक्षक हातमोडे यांनी सांगितले.