मिशन- २०२२ : महाविकास आघाडीसाठी संजोग वाघेरे-पाटलांची वज्रमूठ; भाजपाच्या स्वबळावर ‘जोरबैठका’
- महाविकास आघाडी एकत्र लढल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा सुसाट
- सेना, राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची प्रतीक्षा
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
‘महाराष्ट्र बंद’च्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडी (शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस) च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये ‘एक सूर’ दिसला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी महाविकास आघाडीसाठी वज्रमूठ बांधली आहे. मात्र, निवडणुकीत महाविकास आघाडी होणार की नाही? याबाबत स्थानिक नेत्यांना पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. आघाडी झाली नाही, तर सर्व जागांवर स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारीही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. दुसरीकडे, सत्ताधारी भाजपाने स्वबळावरच ‘जोरबैठका’सुरू केल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात महाविकास आघाडी झाल्यास शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये पक्षांतर्गंत बंडाळी माजणार आहे. शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद मोठी आहे. त्यानंतर शिवसेनाचा काहीसा वरचष्मा आणि काँग्रेस मात्र दुबळी आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या महाविकास आघाडी झाल्यास राष्ट्रवादी सर्वाधिक जागा लढणार ही निर्विवाद सत्य आहेत. शिवसेनेच्या वाट्याला २० ते २५ जागा येतील, तर दुसरीकडे काँगेसरही २० ते ३० जागा मागणार आहे. शिवसेना आणि काँग्रेसला सुमारे ४५ ते ५० जागा दिल्यास राष्ट्रवादीच्या वाटल्या केवळ ७० ते ७५ जागा लढता येणार आहेत. हीच महाविकास आघाडीसमोरील प्रमुख अडचण आहे. शिवसेना आणि काँग्रेसला पिंपरी-चिंचवडसह पुण्यात संघटना मजबूत करुन नगरसेवकांची संख्या वाढवायची आहे. त्यामुळे शिवसेना नेते संजय राउत यांनी स्वबळावर सत्ता आणण्याची घोषणा केली होती. काँग्रेसचीही तिच भूमिका राहणार आहे. महाविकास आघाडीबाबत एकमत झाल्यास तीन पक्षांच्या इच्छुकांची संख्या १४ ते १८ होणार आहे. त्यापैकी केवळ ३ उमेदवारांना संधी मिळणार आहे. म्हणजे महाविकास आघाडी झाल्यास बंडखोरीला चालना मिळणार आहे.
२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे १०८ उमेदवार रिंगणात होते. तसेच, राष्ट्रवादीचे १०७ आणि काँग्रेसच्या ६५ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. भाजपाला एकूण साडेअकरा लाख मते मिळाली आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादीला ९ लाख आणि शिवसेनेला ५ लाख मते मिळाली आहेत. काँग्रेसला केवळ ९७ हजार मते मिळाली आहे. महाविकास आघाडीचे मते ही सुमारे १५ लाख होतात. त्या तुलनेत भाजपाकडे केवळ साडेअकरा लाख मते राहतील, असे आकडेवारी सांगते. पण, महाविकास आघाडीला बंडखोरी रोखता आली पाहिजे. तिकीट मिळालेल्या उमेदवारांचा इतरइच्छुकांनी प्रामाणिक प्रचार केल्यास महाविकास आघाडी सत्तेचे समीकरण गाठू शकरणार आहे. परंतु, प्रत्येक कार्यकर्त्याला राजकीय महत्त्वाकांक्षा असते. त्यामुळे बंडखोरी अटळ आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांचा निकालाचा परिणाम…
राज्यात सहा जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपाने सर्वाधिक २३ जागा मिळवल्या आहेत. पण, राष्ट्रवादी १७, काँगेस १७ आणि शिवसेनेने १२ जागा ताब्यात ठेवल्या आहेत. महाविकास आघाडीची एकत्रित ताकद या निवडणुकीत दिसली. या निवडणुकांमधील निकालाचे आवलोकन करता पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडी भाजपापेक्षा सरस होवू शकते. पण, स्थानिक नेत्यांमध्ये होणारी चिखलफेक आणि पक्षश्रेष्ठींमध्ये असलेला समन्वयाचा अभाव यामुळे महाविकास आघाडीचे गणित जुळणे कठीण दिसत आहे. कारण, निवडणुका अवघ्या चार महिन्यांवर आल्या असताना अद्याप महाविकास विकास आघाडी होणार की नाही? याबाबत संभ्रम आहे. कालच्या बंदमध्ये एकत्रित सहभागी झालेले महाविकास आघाडीचे स्थानिक नेते उद्या निवडणुकीत एकत्र येणार की विरोधात लढणार याबाबत संभ्रम असल्याने भाजपा एकला चालो रे…च्या भूमिकेतून पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी झुंज देताना दिसत आहे.