दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्यामुळे अल्पवयीन मुलांनी केला ‘त्या’ व्यक्तीचा खून…पिंपरी-चिंचवडमधील घटना
पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवडमधील जाधववाडी चिखली येथे दुचाकीचा धक्का लागला म्हणून अल्पवयीन मुलाला कानशिलात लगावन एकाच्या जीवावर बेतलं आहे. दुचाकीवरील अल्पवयीन मुलांनी त्या व्यक्तीचा सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी १४ आणि १७ वर्षीय मुलांना ताब्यात घेतलं आहे. तर, सुनील सगर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सुनील हे जीव वाचवण्यासाठी किराणा दुकानात धावत जाऊन थांबले होते. मात्र, त्यांना दुकानातून धक्काबुकी करत रस्त्यावर आणून त्यांचा खून करण्यात आला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुलं मित्राची दुचाकी घेऊन जाधववाडी, शिवरस्ता येथील रस्त्यावरून जात होते. तेव्हा, भरधाव वेगात असलेल्या दुचाकीचा धक्का सुनील सरग यांना लागला. या नंतर ती अल्पयीन मुलं थांबली, त्यानंतर सुनील यांनी त्यापैकी एका मुलाच्या कानशिलात लगावली होती, अशी माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे.
त्याचा राग मनात धरून त्या अल्पवयीन मुलांनी तिथेच बाचाबाची केली, सुनील हे तेथून पळू लागले. तेव्हा, जवळील एका किराणा दुकानात जाऊन थांबले. त्या मुलांनी त्यांचा पाठलाग केला आणि दुकानातून त्यांना धक्काबुकी करत बाहेर काढले. रस्त्यावर येताच त्यापैकी एकाने सिमेंटच्या गट्टूने दोन ते तीन वेळेस त्यांच्या डोक्यात मारून त्यांचा खून केला. सुनील यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
चिखली पोलिसांनी अस पकडल अल्पवयीन मुलांना…
ज्या दुचाकीवरून अल्पयीन मुले जात होती. त्याची माहिती पोलीस कर्मचारी विश्वास नाणेकर, सावंत, चोरघे, होले आणि सपकाळ यांनी काढली. संबंधित दुचाकी ही बिरेंद्र नावाच्या व्यक्तीची असल्याचं समोर आलं. त्यांना याबाबत माहिती विचारली असताना त्यांचा मुलाने त्याच्या दोन मित्रांना दुचाकी दिल्याच निष्पन्न झालं. त्यानंतर, वेळ न घालवता या दोन अल्पयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.