दि.बा.पाटलांचे नाव विमानतळाला देण्यासाठी सोमवारी मशाल मोर्चा
नवी मुंबई- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा पाटील यांचे नाव देण्यावरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे. येत्या सोमवारी, 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मशाल मोर्चात भूमिपूत्र एकवटणार असून विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यास सरकारला भाग पाडू असा इशाराच 27 गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांनी दिला आहे.
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या अशी भूमिपुत्रांची मागणी आहे. पण राज्य सरकार यासाठी तयार नाही. त्यामुळे या आधीही भव्य असे मोर्चे काढण्यात आले होते. गेल्या काही दिवसांआधी यावर मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही असा इशाराही नामकरण समर्थक समितीतर्फे देण्यात आला होता. यानंतर आता पुन्हा एकदा 9 ऑगस्टला मशाल मोर्चा निघणार आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना नंदराज मुंगाजी म्हणाले की, येत्या 9 तारखेला जसे ते दि.बा.पाटील यांचे जन्मस्थान मशाल मोर्चा निघणार आहे. तिथे संपुर्ण भूमिपूत्र जमून एकजुटीने शपथ घेणार आहोत. स्व. दि.बा.पाटील यांचे विमानतळाला नाव लागल्याशिवाय गप्प बसणार नाही. ज्या बाजूला जनतेचा कौल असेल ते सरकारला मान्यच करावे लागेल. हजारोेंच्या संख्येने प्रत्येक गावातून कमीतकमी 700 ते 800 असे आम्ही 27 गावांतून जास्तीत जास्त तरुण वर्गाला घेऊन जशेला जाणार. तिथे मशाल पेटवून तिच मशाल घेऊन गावात फिरून मिरवणुक काढून घोषणाबाजी करुन स्व. दि.बा.पाटील ‘अमर रहे…अमर रहे’च्या घोषणा देत संपुर्ण जनजागृती करुन विमानतळाला त्यांचे नाव देण्यास सरकारला भाग पाडू. जर सरकारने ऐकले नाही तर 9 तारखेनंतर पुढची भूमिका ठरवू असेही त्यांनी सांगितले.