खटावचे शहीद जवान अजिंक्य राऊत यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
खटाव – सातारा जिल्ह्यातील खटावचे सुपुत्र शहीद जवान अजिंक्य किसन राऊत (२७) यांना सिकंदराबाद येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आल्यानंतर काल रात्री उशिरा येथील स्मशानभूमीत लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘हुतात्मा जवान अजिंक्य राऊत अमर रहे’च्या घोषणा व साश्रुनयनांनी या वीरपुत्राला जवानांनी अखेरची मानवंदना दिली.
आपल्या गावच्या वीरपुत्राला अखेरचा निरोप देताना अनेकांच्या अश्रुंचे बांध फुटलेले दिसत होते. वीर जवान अजिंक्य यांचे पार्थिव सिंकदराबादवरून खटाव येथे आणण्यात आले. सुरुवातीला पार्थिवाचे सर्वांनी दर्शन घेतल्यानंतर फुलांनी सजवलेल्या विशेष वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी रस्त्यावर रांगोळी व फुलांचा सडा टाकण्यात आला होता. अजिंक्य यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी जनसागर लोटला होता. येथील पिंपळेश्वर मंदिर परिसरात चौथरा सजवण्यात आला होता. अंत्ययात्रा अंतिम ठिकाणी पोहोचताच लष्कर व पोलीस अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या पार्थिवाला लपेटलेला तिरंगी ध्वज काढून लष्करी अधिकाऱ्यांनी वीरपत्नी कोमल यांना सुपूर्द करताच उपस्थितांचे काळीज हेलावून गेले. यावेळी वीर जवानाला मानवंदना देण्यात आली. त्यांचा भाऊ अक्षय याने पार्थिवाला भडाग्नी दिली. यावेळी आमदार महेश शिंदे, जि. प. उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सरपंच नंदकुमार देशपांडे यांच्यासह लष्करी अधिकारी, पोलीस, महसूल व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. दोनच महिन्यांपूर्वी सुट्टीनंतर ते कामावर हजर झाले होते. लहान भाऊ अक्षय हा इंडियन एअर फोर्समध्ये कार्यरत आहे. अजिंक्य यांच्या निधनापूर्वी एक दिवस अगोदरही त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व भाऊ असा परिवार आहे.