उष्ण महिना ठरला मार्च
नवी दिल्ली | देशभरात १२२ वर्षांतील सर्वांत उष्ण महिना यंदाचा मार्च महिना ठरला आहे. देशात अनेक ठिकाणी या काळात उष्णतेची लाट होती. हवामान विभागाने ही माहिती दिली. अपुऱ्या पावसाचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे.
देशात मार्च महिन्यात सरासरी कमाल तापमान ३३.१० डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. १२२ वर्षांतील हे सर्वाधिक तापमान आहे. मार्च २०१०मध्ये मार्च महिन्यातील कमाल तापमान ३३.०९ डिग्री सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. देशात मार्च महिन्यातील किमान तापमान २०.२४ डिग्री सेल्सिअस इतके होते. १२२ वर्षांतील तिसऱ्यांदा किमान तापमान सर्वांत जास्त नोंदविण्यात आले आहे.
यापूर्वी १९५३मध्ये २०.२६ डिग्री सेल्सिअस आणि २०१०मध्ये २०.२५ डिग्री सेल्सिअसची नोंद करण्यात आली होती. वायव्य भारतात सरासरी कमाल तापमान ३०.७३ डिग्री सेल्सिअस इतके होते. १२२ वर्षांतील ते सर्वाधिक आहे. मार्च २००४मध्ये हाच आकडा ३०.६७ डिग्री सेल्सिअस इतका होता.
देशात येत्या दोन ते चार दिवसांत जम्मू, हिमाचल प्रदेश, गुजरात, झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये येत्या दोन दिवसांत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे