“लस उत्सव साजरा करण्यासाठी आधी लस तरी उपलब्ध करून द्या” – जयंत पाटील
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये 4 दिवस लसीकरण उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील नेत्यांनी पंतप्रधानांवर टीका करायला सुरुवात केली. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात 2 ते 3 दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक असल्याचं नुकतंच बोलून दाखवलं.
त्यानंतर, महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. तसेच आता लसीकरणावरून महाराष्ट्रात वाक् युद्ध पेटलं असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधानांना लसीकरण उत्सवावरून टोला लगावला आहे.
लस उत्सव साजरा करण्यासाठी आधी लस तरी उपलब्ध करून द्या, मगच लस उत्सव साजरा करता येईल, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी पंतप्रधानांना लगावला आहे. महाराष्ट्रात लसीचा तुटवडा असताना लस उत्सव साजरा करण्यासाठी आधी लस द्या आणि जर लस नसेल तर या लसीकरण उत्सवाची वेळ बदला, असं जयंत पाटील यांनी पंतप्रधानांना उद्देशून म्हटलं आहे.
महाराष्ट्रात लसींच्या तुटवड्यावरून मोठ्या प्रमाणात राजकीय टीकाटिप्पणीला जोर आल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील सांगली, सातारा, पनवेल, पुणे इत्यादी ठिकाणी लसींचा पुरवठा नसल्याने लसीकरण मोहीम थांबवण्यात आल्याचं चित्र दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने केंद्राला तर आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. त्यातच पंतप्रधानांनी लसीकरण उत्सव साजरा करण्यास सांगितल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधानांना टोला लगावल्याचं पाहायला मिळालं.