कल्याणमध्ये पोलिसांची मोठी कारवाई: तब्बल १२ गुंडांवर मोक्का; ८ जण अटकेत
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरात मागील काही दिवसांपासून वाढलेल्या सामूहिक गुंडगिरीविरोधात कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी महत्वपूर्ण कारवाईचे निर्देश दिले आहेत. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई केल्यानंतर आता कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी एका खंडणीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या १२ आरोपींविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. एकाच वेळी १२ आरोपींवर मोक्का लावण्याची कल्याणामधील ही पहिलीच घटना आहे.
कल्याण-डोंबिवलीत चोरी, घरफोडी, मारहाण, रात्रीच्या सुमारास दंगल करणे, वाहनांची तोडफोड, आदी प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: कल्याण पूर्व भागात तर गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गावगुंडांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. रस्त्यावर तलवारी, लोखंडी सळई, दांडके घेऊन फिरणे, वाढदिवसावेळी फायरिंग करणे असे अनेक प्रकार घडले आहेत.
या पार्श्वभूमीवर डीसीपी सचिन गुंजाळ यांनी या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कल्याणचे एसीपी उमेश माने-पाटील आणि डोंबिवलीचे एसीपी जय मोरे यांना गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार १४ एप्रिल रोजी कल्याण पूर्वेत घडलेल्या दरोडा आणि मारहाणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी १२ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत यातील ८ आरोपींना अटक केली. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे तर उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत असून या सर्व आरोपींविरोधात हत्या, अपहरण, खंडणी, जबरी चोरी, धमकवणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. तसंच प्रत्येक आरोपीविरोधात एकूण १२ ते १७ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट होत असल्याने या आरोपींविरोधात सामूहिक गुन्हेगारीविरोधी कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आल्याचे एसीपी उमेश माने पाटील यांनी सांगितलं आहे.