महाविकास आघाडीची निष्क्रीयता अखेर सिद्ध : भाजपा प्रवक्ते अमोल थोरात
मोशी-चिखलीतील महाविकास आघाडीच्या कंदील मोर्चावर टीका
पिंपरी । प्रतिनिधी
मोशी-चिखली येथील शिवसेना-राष्ट्रवादीच्या नगरसेवक-पदाधिकाऱ्यांनी महावितरण विरोधात कंदील मोर्चा काढून राज्यातील महाविकास आघाडी सरकारची निष्क्रीयता सिद्ध झाली आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात थोरात यांनी म्हटले आहे की, ‘‘बांधिलकी आमची जनतेशी’’ असा नारा म्हणत पिंपरी-चिंचवड शहरातील महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांनी स्वतःच्याच राज्य सरकारच्या महावितरण विरुद्ध कंदील मोर्चाचे आयोजन केले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार निष्क्रिय आहे याचा हा पुरावाच आहे. निवडणूकीच्या निमित्ताने का होईना स्थानिक इच्छुकांनी हे मान्य केले यामध्येच पिंपरी-चिंचवडकरांचे हित आहे, असेही थोरात यांनी म्हटले आहे.
थोरात म्हणाले की, राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे. उर्जा मंत्रालयाचा कारभार काँग्रेसचे नितीन राऊत यांच्याकडे आहे. मग, शहरातील वीज विषयक समस्या सुटत नाहीत. सामान्य नागरिक आणि उद्योजकांसह व्यापारीही वीज समस्यांमुळे हतबल झाले आहेत. असे असताना शिवसेना- राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे दाद मागण्याऐवजी राजकीय ‘स्टंटबाजी’ केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे अपयश पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.