“नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकार..”; नव्या वर्षी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा संकल्प
पुणे |
कोरेगाव भीमा येथे शनिवारी २०४ वा शौर्य दिन साजरा होत आहे. या निमित्ताने कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी हजेरी लावली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे, नितीन राऊत, संजय बनसोडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मंत्री विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोहचले होते.. १८१८ साली कोरेगाव भीमा इथे पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध झालेल्या लढाईत गाजवलेल्या शौर्याबद्दल हा स्तंभ उभारण्यात आला होता. त्यानंतर अनेकांकडून या ठिकाणी मानवंदना देण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कोरेगाव भीमा येथे भेट देत विजयस्तंभाला मानवंदना दिली. “शौर्यदिन आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे. १८१८ साली या ठिकाणी ५०० जणांनी बलिदान दिले होते. या निमित्ताने सर्व आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी एकजुटीने पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी पुढाकार घेण्याची माझी तयारी आहे,” असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.
पत्रकारांनी यावेळी रामदास आठवले यांना नविन वर्षाचा संकल्प काय आहे असे विचारले असता त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “नविन वर्षाचा संकल्प हा महाविकास आघाडी सरकार घालवायचा आहे. रिपब्लिकन पक्ष अत्यंत मजबूत करायचा आणि समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करायचा असा संकल्प असणार आहे,” असे रामदास आठवले म्हणाले. दरम्यान, त्याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विजयस्तंभाला मानवंदना दिली. कोरेगाव भीमा इथला इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीने निधी मंजुर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील समिती त्यासाठी काम करेल. त्याचबरोबर तुळापूर आणि वढू इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला भव्य बनवले जाईल, असं अजित पवार म्हणाले.