Mahashivratri : भगवान महादेवाच्या शिवलिंगाला अर्ध प्रदक्षिणाच का घातली जाते?
महाईन्यूज | अधिक दिवे | भगवान महादेव यांची संपूर्ण जगभरात मंदिर आहेत. ज्योतिर्लिंग, स्वयंभू लिंग यासह छोट्या चबुतऱ्यांवरही शिवलिंगाची स्थापना केली जाते. महादेवाची पूजा सर्वाधिक केली जाते, कारण भगवान शंकरांना देवांचे देव अर्थात महादेव म्हटले जाते. त्रिदेवांमध्ये संहाराचे अधिपती म्हणून भगवान शंकरांना ओळखले जाते.
सर्वसाधारणपणे, कोणत्याही मंदिरात मूर्तीला पूर्ण प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. मात्र, महादेवाच्या शिवलिंगाभोवती पूर्ण प्रदक्षिणा घातली जात नाही. अर्ध प्रदक्षिणा घालूनच भगवान महादेव यांना प्रार्थना केली जाते.
जोतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवांच्या पींडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाहीत, तर अर्धी प्रदक्षिणा करुन नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्तांचा अदृश्य रुपाने उपस्थित असतात. तथा उत्तर दिशेने महादेवांच्या पींडीवर जलाअभिषेक घातलेले पाणी तीर्थ रुपाने वाहत असते ते ओलांडून गेल्याचे पातक लागते, असे मानले जाते.
देवघरात महादेवाची मूर्ती का नसावी?
महादेवांचा फोटो अथवा मूर्ती फक्त स्मशानात असते, देवघरात महादेवांचा फोटो अथवा मुर्ती नसावी. मानवाला पींड पूजन सांगीतले आहे. म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवांचे मुख्य शक्ति पीठांवर महादेवांची पींड लिंग रुपाने स्थापन केलेले समजते. १२ ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच पींड रुपाने आहेत, यातुन संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते. भगवान महादेव हे देवाधिदेव असुन हे न्यायप्रिय दैवत आहेत आणि यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत, आणि जसे देव, दानव, यक्ष, किन्नर, भूतं, प्रेतं, पिशाच्चं, आणि इतरही अनेक योनी जीव महादेवास भजतात. आणि जिथे महादेवांची मूर्ती/फोटो असतो तिथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात.
घरातील शिवलिंग कसे असावे?
घरात देवघरातील पींडीवर नाग नसावा तथा नंदीही नसावा. पींड साधी दगडी असली तरी चालते मात्र शक्यतो पितळेची असावी. देवघरातील पींड 3 इंचा पेक्षा मोठी असु नये ती 3 इंच पेक्षा छोटी असावी.
कशी करावी महादेवाची पूजा ?
महादेवांना नित्य शुद्ध पाण्यासह रुद्रसुक्त पठण करीत जलाभिषेक करावा. महादेवांना जल अति प्रिय आहे, एखाद्याने महादेवांस जल अर्पण केल्यास ते त्यावर खुप प्रसन्न होतात. महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जलरुद्राभिषेक केल्यास विपूल पर्जन्यमान राहते. गुरुचरित्रात असे म्हटले आहे की, नित्यच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य, आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो.
‘हा’ उपाय केल्याने आपल्या घरी लक्ष्मी वास करेल!
श्रीमद्भागवतात म्हटले आहे की, महादेवांची नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रिया राहते आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते.
‘या’ सात वस्तू भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका!
भगवान शंकरांविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते. उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
खाली दिलेल्या या गोष्टी भगवान शंकरांना कधीही अर्पण करु नका…
१. शंख – शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असूराचा वध केला होता. तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते.
२. हळद कुंकू- भगवान शंकर आजन्म वैरागी होते. त्यामुळे शृंगाराशी संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही. हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते. त्यामुळेच हळद किंवा कुंकु भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही. या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात.
३. तुळशी पत्र – असूरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती. भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता. त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता.
४. नारळ पाणी – नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरांवर अभिषेक केला जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रुप मानले जाते. म्हणून शुभकार्यात नारळाचा वापर करुन त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो. पण, भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते.
५. उकळलेले दूध – उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये. त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा. बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते. त्यामुळेच त्याचा वापर करणेही टाळावे.
६. केवड्याचे फूल – भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे. शिव पुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता.
७. कुंकू किेंवा शेंदूर – कुंकू किंवा शेंदूराचा वापरही भगवान शंकरांची पूजा करण्यात वर्ज्य केला आहे.