साताऱ्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा

सातारा : साताऱ्याततील प्रमुख धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन सिंचन मंडळाने नियोजन सुरू केले आहे. मागील वर्षी काही मध्यम प्रकल्पांत चिंताजनक पाणीसाठा असताना यावर्षी मात्र चिंता दूर करणारी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी यांनी सुटकेच्या नि:श्वास सोडला आहे.
जिल्ह्यातील प्रमुख जलस्रोत असलेल्या कोयना धरणात सध्या १००.०३ टीएमसीच्या प्रकल्पीय उपयुक्त साठ्यापैकी ५४.४९ टीएमसी पाणीसाठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत समाधानकारक आहे. धोम धरणामध्ये ५.०३ टीएमसी पाणी असून, ते ४३.६६ टक्के भरलेले आहे. धोम-बलवडी धरणात ३६.६३ टक्के पाणीसाठा आहे. ही आकडेवारी पाहता यंदा धरण क्षेत्रात समाधानकारक जलसाठा असल्याचे स्पष्ट होते.
हेही वाचा – बारामती बाजार समितीतून लंडनला आंबा रवाना
मागील वर्षी येरळवाडी, नेर, राणंद, नागेवाडी या मध्यम प्रकल्पांमध्ये चिंताजनक पाणीस्थिती होती. मात्र, यावर्षी या धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सातारा सिंचन मंडळाकडून पाण्याची आवर्तने सुरू करण्यात आली आहेत. उन्हाळी पिकांसाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे. जिल्ह्यातील पाण्याची मागणी वाढणार असल्याने सिंचन मंडळाने पाण्याचे व्यवस्थापन सुरू केले आहे. भविष्यातील पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जलसंधारण, पाण्याचे नियोजन आणि काटकसरीने पाण्याचा वापर करण्यावर भर दिला जात आहे.
जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाणीसाठा असून, सिंचनासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता आहे. जिल्ह्याची वाढती लोकसंख्या, औद्योगिक क्षेत्राचा विस्तार आणि कृषी सिंचनाच्या वाढत्या गरजा लक्षात घेता, पाण्याच्या नियोजनावर विशेष भर दिला जात आहे. यासाठी सातारा सिंचन मंडळाकडून उपाययोजना आखण्यात येत आहेत. पावसाळ्यात जलसंचनाचे योग्य नियोजन करून आवश्यकतेनुसार पाणी वापरता येईल, याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. सातारा सिंचन मंडळाने पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे.