आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा, महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांसाठी माऊलीला साकडं

Ashadhi wari 2025: आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा केली. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होत्या. पहाटे ३ च्या दरम्यान विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि नाशिकमधील मानाचे वारकरी उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. त्यानंतर रुक्मिणी मातेच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री फडणवीस आणि उगले दाम्पत्यांनी पूजा केली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी पत्नी अमृता आणि कन्या दिवीजा यांच्यासमवेत शासकीय महापूजा करण्याचे सौभाग्य लाभले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि विठुमाऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हेही वाचा – आषाढी यात्रा संपताच उजनीतून भीमेत पुन्हा पाणी सोडणार
आषाढी एकादशीचा आनंदोत्सव पंढरपूरमध्ये साजरा होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी पंढरी नगरीत दाखल झाले आहेत. संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करण्यात आला. देवाला मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख परिधान करण्यात आला. त्यानंतर विठ्ठलाची आरती करण्यात आली. विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली.
महिनाभर वारीकरत चालत असणारे वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरी नगरीत दाखल झाले आहेत. यंदा नाशिकचे उगले दाम्पत्य हे मानाचे वारकरी ठरले आहेत. मूळचे नाशिक जिल्ह्यातील जातेगावचे असलेले कैलास उगले आणि कल्पना उगले यांना विठूरायाच्या महापूजेचा मान मिळाला आहे. मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. विठ्ठल दर्शनाची आस लागलेली असताना वारकरी वारी काढत विठ्ठलाच्या मंदिराच्या दिशेना पायी यात्रा करत असतात. संपूर्ण महाराष्ट्रातून दिंड्या आणि पालख्या विठ्ठल भेटीसाठी निघालेल्या असतात. माऊली माऊलीचा गजर करत आणि ग्यानबा तुकाराम म्हणत ही वाट सरते. विठ्ठलाचं दर्शन न घेता कळसाचं दर्शन घेऊन वारकरी घरी परतात. वारीच्या या आनंद सोहळ्याला ८०० वर्षांहून अधिक मोठी परंपरा आहे.