Pune : समृद्धी महामार्गावर अपघातात शिरूरमधील दांपत्यासह २१ वर्षीय मुलीचा मृत्यू

पुणे : समृद्धी महामार्गावर बसच्या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. नागपूरहून पुण्याकडे ही बस येत असताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा येथे हा अपघात झाला आहे. या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दांपत्याचा २१ वर्षीय मुलीसह दुर्दैवी मृत्यू झाला. नागपूरला मुलाच्या नॅशनल लॉ स्कूलमध्ये प्रवेशासाठी ते गेले होते.
बारामतीतील नामांकित वकील अमर काळे यांच्या भगिनी कांचन कैलास गंगावणे (वय ३८), कैलास बबन गंगावणे (शिक्षक, वय ४५ वर्ष), ऋतुजा कैलास गंगावणे (वय २१ सर्व रा. शिरूर) यांचा या भीषण अपघातात झालेल्या मृतांमध्ये समावेश आहे.
कैलास गंगावणे आणि कुटुंबीय हे त्यांचा मुलगा आदित्य गंगावणे याचे मेरिटमध्ये नाव आल्याने नॅशनल लॉ स्कूल नागपूर येथे त्याच्या प्रवेशासाठी गेले होते. दरम्यान, ते पुण्याकडे परतत असताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळे गावाजवळ ते प्रवास करत असलेल्या बसचा अपघात झाला.
हेही वाचा – पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! लोणावळ्यातील ‘भुशी धरण’ ओव्हरफ्लो
मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत
झालेली घटना अतीशय दुर्दैवी व दुःखद आहे. विदर्भ एक्स्प्रेस ही खासगी बस नागपूरहून निघाली होती. मी पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे. यात दुर्दैवाने २५ लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. जे सुखरूप आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात कशामुळे झाला, नेमकं काय घडलं, याची चौकशी तर होईलच. मात्र, मी जखमींवर तातडीने उपचार करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. तशाप्रकारे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रवाशांची ओळख पटवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. अपघातातील मृतांच्या कुटुंबांना सरकार ५ लाख रुपयांची मदत देईल, अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली.





