अलमट्टी धरणावर महाराष्ट्र सरकारचा अधिकारी ठेवलाय, प्रशासनाकडून योग्य नियोजन; हसन मुश्रीफ
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरुच आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आणि आता नदीची वाटचाल धोका पातळीकडे सुरु आहे. त्यामुळे नदीच्या परिसरात असलेल्या गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी नेलं जात आहे. एनडीआरएफच्या दोन टीम दाखल झाल्या असून त्यांच्याकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचं काम केलं जात आहे. याबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज तरी परिस्थिती आटोक्यात असल्याचं म्हटलंय. मात्र दोन दिवस असाच पाऊस राहिला तर परिस्थिती गंभीर होऊ शकते, अशी भीती मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केलीय.
काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची येडियुरप्पा यांच्याशी बोलणं झालं आहे. आलमट्टी धरणातून पाणी सोडलं जातं की नाही हे पाहण्यासाठी आलमट्टी धरणावर महाराष्ट्र सरकारचा अधिकारी ठेवला आहे. संभाव्य पूराचा धोका पाहता जिल्हा प्रशासनाकडून योग्य नियोजन केलं गेलं आहे. चिपळुणसारखी स्थिती कोल्हापूर जिल्ह्यात सध्यातरी नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन मुश्रीफ यांनी केलंय. काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची येडियुरप्पा यांच्याशी बोलणं झालं आहे. आलमट्टी धरणातून पाणी सोडलं जातं की नाही हे पाहण्यासाठी आलमट्टी धरणावर महाराष्ट्र सरकारचा अधिकारी ठेवला आहे.
परिस्थिती बिघडली तर एनडीआरएफच्या अजून टीम बोलावल्या जातील. नागरिकांना स्थलांतरित करायची वेळ आली तर होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांची वेगळी व्यवस्था केली जाईल, असंही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं.