लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’
मुंबई – राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांविरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ हा महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज यावर चर्चा झाली. 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद ठेवण्यात येणार आहे.
लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. यात चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. सोमवारपासून काँग्रेससह विरोधी पक्षाचे नेते लखीमपूर खेरी येथे जाऊन मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. पण उत्तर प्रदेश सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांना तिथे जाऊ देत नाहीय. काल याच संदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये ज्या कारने शेतकऱ्यांना चिरडले, ती कार आमचीच होती, अशी कबुली केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. माझा मुलगा घटनास्थळी असल्याचा एक पुरावा दाखवा, मी लगेच मंत्रिपदाचा राजीनामा देतो, अशी भूमिका अजय मिश्रा यांनी घेतली आहे
उत्तर प्रदेशपेक्षा जास्त मदत देणार पंजाब आणि छत्तीसगढ
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी लखीमपूरला गेले आहेत. यावेळी राहुल गांधींसोबत पंजाब आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री होते. या दोन्ही राज्यांनी मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५०-५० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशने लखीमपूरमध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ४५ लाख रुपये आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा सोमवारी केली होती.