शुभांगी पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार ‘नॉट रिचेबल’
शुभांगी पाटील या भाजपच्या डमी उमेदवार – सुभाष जंगले
पुणे : महाविकास आघाडीचे नाशिक, औरंगाबाद व नागपूर येथील विधानपरिषद निवडणुकीसाठी उभे राहिलेले तीन उमेदवार अचानक गायब झाल्याने मोठी खळबळ माजली आहे. नाशिकच्या ठाकरे गट समर्थक उमेदवार शुभांगी पाटील, नागपूर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश एटकेलवार तर औरंगाबादमधून राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार प्रदीप सोळुंके हे तिन्ही नेते आज सकाळ पासून नॉट रिचेबल येत आहेत.
आज विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने हे तिन्ही नेते अचानक ‘नॉट रिचेबल’ का झाले ? या वरून राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. नाशिकच्या शुभांगी पाटील यांना उद्धव ठाकरे गटाने समर्थन जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर उमेदवारी अर्ज घेण्यास दबाव होता अशी माहिती आहे. या दरम्यान शुभांगी पाटील यांची गाडी अंबड भागात उभी असून पाटील नेमक्या कुठं आहेत हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. दुसरीकडे अॅड. सुभाष जंगले यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा आपल्यालाच पाठिंबा असल्याचा दावा केल्याने मोठा ट्विस्ट या निवडणुकीत आला आहे. शुभांगी पाटील या भाजपच्या डमी उमेदवार आहे, असा आरोप सुभाष जंगले यांनी केला आहे.
अशातच आज महाविकास आघाडीची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. नाशिक विधान परिषद निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाली आहे. बैठकीत अजित पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे, जयंत पाटील सहीत अनेक नेते उपस्थित होते. नाशिक विधान परिषद मतदार संघ निवडणुकीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस पक्ष लवकरच याबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.