कुटुंबीयांचा विरोध डावलून केला प्रेमविवाह; पण
औरंगाबाद | मुलगा मराठी भाषिक मुलगी हिंदी भाषिक पण दोघांचा एकमेकांवर जीव जडला आणि दोघांनी कुटुंबीयांचा विरोध डावलून केला प्रेमविवाह केला. मात्र वर्षभरात दोघांचमध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे पत्नीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वैफल्यग्रस्त पतीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मनाला चटका लावणारी ही घटना औरंगाबादच्या वाळूज भागातील रांजणगाव शेणपुंजी येथे घडली. तर आकाश संतोष बनसोडे (२५, मूळ रा. वरखेडा, ता. सेनगाव, जि. हिंगोली) असे मृताचे नाव आहे.
मूळची मध्यप्रदेशची राहणारी पूनम आणि आकाश यांची दीड वर्षापूर्वी पुणे येथील एका खासगी कंपनीत काम करताना ओळख झाली. ओळखेचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी घरच्यांचा विरोध डावलून २० ऑक्टोबर २०२१ रोजी पुणे येथे लग्न केले. लग्नानंतर आकाशच्या घरच्यांनी दोघांना स्वीकारून गावी नेले. तिथे महिनाभर राहिल्यानंतर हे दांपत्य औरंगाबादेत आले. ते रांजणगावात राहू लागले. दरम्यानच्या काळात पूनम गरोदर राहिली.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पूनम व आकाशमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. यातूनच पूनमने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात धाव घेत मारहाण करणाऱ्या आकाश विरोधात तक्रार दिली. त्यानंतर आपण घर सोडून माहेरी जात असल्याचे सांगत घरातून निघून गेली.त्यानंतर औरंगाबाद- नगर महामार्गावर असणाऱ्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.पत्नी सोडून गेल्याने वैफल्यग्रस्त आकाशने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.