पुण्यात लॉकडाउन? अजित पवारांचं मोठं विधान
मुंबई |
देशात करोना रुग्णसंख्या वाढत असून यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशात सर्वाधिक करोना रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात आहेत. यामध्ये पुण्याचाही समावेश आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक शहरांनी लॉकडाउनचा पर्याय निवडला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील स्थितीसंबंधी माहिती दिली असून लॉकडाउनसंबंधीही भाष्य केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. “मोठ्या प्रमाणात करोनाचं संकट वाढू लागलं आहे. मुख्यमंत्र्यांसहित सर्वजण आवाहन करत आहेत. काही शहरांमध्ये प्रमाण वाढलं आहे. पालकमंत्री नात्याने उद्या पुण्यात लोकप्रतिनिधींना बोलावालं असून दर शुक्रवारी अधिकाऱ्यांसोबत बैठक होत असते. या बैठकीत आम्ही निर्णय घेतो. लॉकडाउनसंबंधी मतांतर आहे, पण नियमांचं पालन केलं पाहिजे यावर एकमत आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
“त्यामुळे पक्षीय राजकारण मधे न आणता हे आपल्या सर्वांवरचं संकट आहे या भावनेने आपण करोनाशी लढलं पाहिजे. आम्ही ४५ वर्षापुढील सर्वांचं लसीकरण करण्याची मागणी केली होती ती मान्य झाली आहे त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार. पण आता ४५ च्या आतील अनेकांना करोना होत आहे. देवगिरी जिथे मी राहतो तिथे अनेक कर्मचारी वास्तव्यास आहेत. काल सगळ्यांची तपासणी केली तर नऊ लोक पॉझिटिव्ह होते. आपल्याला करोनाचा मुकाबला करावाच लागणार आहे. त्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून आर्थिक मदत कम कमी पडू न देण्याची भूमिका आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
अजित पवार यांनी यावेळी इतर मुद्द्यांवरही भाष्य केलं. “अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या झाल्या आहेत त्या कोणाच्या सांगण्यावरुन झालेल्या नाहीत. त्यासाठी एक कमिटी असते. यासंदर्भात नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे. ज्या चार पाच अधिकाऱ्यांची नावं घेण्यात आली त्यांची बदलीच झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी माझ्यासमोर यासंदर्भात मुख्य सचिवांना सूचना दिल्या आहेत. त्यांना अहवाल देण्यासाठी सांगितला असून दुपारपर्यंत तो अहवाल येईल. यातून अनेक गोष्टी स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे,” अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. “मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे वेळ मागितली होती. तिन्ही पक्षांचे प्रमुख राज्यपालांना भेटून सध्याची परिस्थिती आणि कामकाजाची माहिती दिली जाणार होती. पण ते बाहेर असल्याने भेट झाली नाही,” असं अजित पवार यांनी सांगितलं.
“परमबीर सिंह यांच्यासंबंधी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असून हायकोर्टातही तारीख आहे. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असल्याने त्यांनी सर्वाची मतं जाणून घेतली. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची भूमिकाही जाणून घेतली आहे. मंत्रिमंडळ उद्दव ठाकरेंच्या पाठीशी आहे असा विश्वास सर्वांनी दिला आहे. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. आपल्याला चौकशीत भेदभाव करण्याची गरज नाही. एटीएसनेही चांगला तपास केला होता. जे सत्य आहे ते राज्यातील जनतेसमोर येईल. अजून कोणची चौकशी करण्याची गरज असेल तर त्यासंदर्भात राज्य सरकार, राज्याचे प्रमुख भूमिका घेतील. भाजपाने केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
“पोलीस दलातील काही सहभागी असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करणार नाही, जे दोषी असतील त्यांच्यावर १०० टक्के कारवाई होईल असा विश्वास मला जनतेला द्यायचा आहे,” असंही अजित पवार म्हणाले आहेत. “बदल्याचं रॅकेट आहे असं म्हटलं जात असून त्यात कोणाची नावं येतायत? त्यांची विश्वासार्हता काय आहे? जी यादी दिली त्यांच्या बदल्या झाल्या का? मी तुम्हाला कागदपत्रं दाखवू का ? मी आज प्रशासनात काम करत नाहीये, ३० वर्ष झाली काम करत आहे. कायदा सुव्यस्थेला तसंच पोलील दलाला गालबोट लावण्याचं काम करत असेल तर त्यांच्यासाठी हयगय करण्याचं काहीच कारण नाही,” असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
वाचा- “देवेंद्र फडणवीस मोदींपेक्षा मोठे नेते असावेत, त्यामुळेच….,” संजय राऊतांचा खोचक टोला