नागपुरात लॉकडाउन वाढवला, 31 मार्चपर्यंत कडक निर्बंध
नागपूर – नागपुरातील लागू करण्यात आलेला आठवड्याभराचा लोक डाउन 31 मार्चपर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांचा ग्राफ सातत्याने वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. या बैठकीनंतर 31 मार्चपर्यंत कठोर निर्णय लागू राहणार असल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे.
नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवलं जाणार आहे. निर्बंध लावताना नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं राऊत यांनी सांगितलं. त्याचबरोबर लसीकरण केंद्रही वाढवले जाणार आहेत. सध्या दिवसाला 20 हजार लोकांचं लसीकरण केलं जातं. ते 40 हजारावर नेण्याचं लक्ष्य असल्याचं राऊत म्हणाले. शहरात कठोर निर्बंध लावण्याबाबत लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं.