#Lockdown: १२ वर्षाच्या मुलीने तीन दिवस चालत कापलं १५० किमी अंतर, घरापासून एका तासाच्या अंतरावर असताना दुर्दैवी मृत्यू
लॉकडाउनमध्ये आपल्या घऱी चालत निघालेल्या १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तेलंगण येथून छत्तीसगडमधील बिजापूर येथे निघालेल्या या चिमुरडीने तीन दिवसांत तब्बल १५० किमीचं अतंर चालत कापलं होतं. जामलो मकदम असं या मुलीचं नाव असून कुटुबाचं पोट भरण्यासाठी ती मिरचीच्या शेतात काम करते. लॉकडाउन असल्याने ती आपल्या घरी चालत निघाली होती. पण घरापासून फक्त एका तासाच्या अंतरावर असताना ती खाली कोसळली आणि जागीच मृत्यू झाला.
१५ एप्रिल रोजी या मुलीने प्रवास सुरु केला होता. तिच्यासोबत शेतात काम करणारे इतर ११ जण देखील होते. हे सर्वजण सलग तीन दिवस चालत होते. प्रवास करताना हायवे टाळण्यासाठी त्यांनी जंगलातूनही प्रवास केला. गावापासून १४ किमी लांब असताना जामलो हिच्या पोटात प्रचंड दुखू लागलं. यामुळे ती तिथेच खाली कोसळली. तिचा जागीच मृत्यू झाला. अखेर रुग्णवाहिकेच्या सहाय्याने तिचा मृतदेह घरी नेण्यात आला.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, डिहायड्रेशन आणि भुकेपोटी तिचा मृत्यू झाला आहे. “करोना चाचणी केली असता तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. तिच्या शरिरातील ऊर्जा कमी झाल्याने तसंच पाण्याची पातळी कमी झाल्याने त्रास सुरु झाला असावा,” असं वरिष्ठ जिल्हा वैद्यकीय अधिकारी बी आर पुजारी यांनी सांगितलं आहे.
मुलीचे वडील अंदोराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून ती तेलंगणमध्ये काम करत होती. “सलग तीन दिवस ती चालत होती. तिच्या पोटात दुखू लागलं होतं. उलट्यांचाही त्रास होत होता”. तिच्यासोबत असणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती पोटभरुन जेवत नव्हती. राज्य सरकारने मुलीच्या कुटंबाला १ लाखांची मदत जाहीर केली आहे.