breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: विमान सेवा घेणार भरारी! २५ मे पासून देशातंर्गत हवाई वाहतूक सेवा होणार सुरू

करोनाच्या प्रादुर्भाव झाल्यानं केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसह देशातंर्गत विमान वाहतूक सेवा बंद केली होती. मागील दीड महिन्यांपासून जास्त काळ विमान सेवा बंद आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं लॉकडाउनला ३१ मे पर्यंत मुदतवाढ देताना अनेक बाबींमध्ये शिथिलता आणण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे हवाई वाहतूक सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर केंद्रानं विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी याविषयीची माहिती दिली.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं देशाच्या सीमा बंद करण्याबरोबच राज्यांच्या सीमाही बंद केल्या होत्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीबरोबर देशातंर्गत विमानसेवा बंद करण्याचा निर्णय केंद्रानं करोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला होता. अखेर लॉकडाउनचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर चौथ्या टप्प्याच्या अखेरीस विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विट करून याविषयीची माहिती दिली आहे.

“२५ मे पासून अंशकालीन पद्धतीनं देशातंर्गत हवाई वाहतूक सुरू करण्यात येईल. २५ मे पासून विमानसेवा सुरू करण्यासाठी सज्ज राहावं, अशी माहिती सर्व विमानतळाच्या प्रशासनाला आणि हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना देण्यात आली आहे. प्रवाशांच्या प्रवासांसंदर्भात नियमावली केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून जारी करण्यात येईल,” असं हरदीप सिंह पुरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हवाई वाहतूक सुरू करताना करोनाचा प्रसार होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन सरकार समोर असणार आहे. विशेषतः याबाबत महाराष्ट्र सरकारला मुंबईत विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. कारण वाहतूक सुरू झाल्यानंतर मुंबईत येणाऱ्यांची संख्या इतर विमानतळांच्या तुलनेत जास्त असू शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button