राज्यावर पुन्हा आस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात
सिंधुदुर्ग | हवामानात वारंवार बदल होत आहेत. अवकाळी पावसामुळे राज्याला झोडपून काढलं आहे. सध्या काही ठिकाणी उन्हाच्या झळा बसत आहेत तर कोकणात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सध्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवकाळी पावसामुळे आंबा, काजू आणि कोकम पीक तसेच सुरगी कळ्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात रात्री आणि पहाटे वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, देवगड सावंतवाडी, कणकवली, दोडामार्ग परिसरात जोरदार वारा आणि विजेच्या कडकडासह मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली.
रात्री विजेच्या कडकडाटासह पाऊस पडल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला होता. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक ठिकाणी पाणी साचल्याचीही परिस्थिती आहे. सगळ्याचं महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यात अद्यापही ढगाळ वातावरण आहेत. त्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण
तळ कोकणात अजून ३ ते ४ दिवस पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल आधीच कोरड्या जागी ठेवावा, नागरिकांनीही काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.