उद्योगांबाबत धोरणांवर चर्चा करायला शिका : प्रदिप पेशकार
- ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’चा वापर आगामी काळात वाढणार
- उद्योग मार्गदर्शन परिसंवादात तज्ञांचा सूर
पिंपरी | प्रतिनिधी
उद्योग, कारखाने, मोठ्या कंपन्या घेत असलेल्या उत्पादना संदर्भात संसदेत अनेक बिले मंजूर होतात. विविध निर्णय अनेकदा घेतले जातात. यावर उद्योजकांना चर्चा करण्यासाठी, हरकती घेण्यासाठी ठराविक मुदत देखील दिली जाते. मात्र या बिलासंदर्भात बऱ्याचदा कोणतीही चर्चा होताना किंवा यावर काही हरकती असल्यास त्या नोंदवताना उद्योजक दिसत नाहीत. आपले उत्पादन किंवा आपल्या कारखान्यासंदर्भात काही निर्णय होत असतील आणि या निर्णयांचे उद्योजक म्हणून आपल्यावर दूरगामी परिणाम होणार असतील तर उद्योजकांनी त्यावर बोलायला हवे. चर्चा करायला हवी. आपल्या मागण्या मांडायला हव्यात, असा सल्ला पिंपरी येथे आयोजित परिसंवादात भाजपा उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष व नॅशनल बोर्ड ऑफ एम.एस.एम.ई. सदस्य प्रदिप पेशकार यांनी रविवारी दिला.
भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष व आमदार मा.महेशदादा लांडगे व आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग आघाडी पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने सेवा उद्योग परिसंवाद आणि एम.एस.एम.ई. विषयी माहीती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी पेशकार बोलत होते.
या कार्यक्रमाला भाजपाच प्रदेश सचिव अमित गोरखे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, राजू दुर्गे, उद्योग आघाडी प्रदेश सरचिटणीस विश्वजीत देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक अमोल सणस, माजी स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, प्रदेश सेवा उद्योग आघाडी प्रमुख आशितोष घोलप, उद्योग आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष निखिल काळकुटे, सरचिटणीस योगेश कदम, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे आदी उपस्थित होते
पेशकार म्हणाले की, संसदेमध्ये उद्योगांवर दूरगामी परिणाम होणारे अनेक निर्णय घेतले जातात. हे निर्णय काही वेळा सकारात्मक, काही वेळा नकारात्मक देखील असतात.या धोरणांवर किंवा निर्णयांवर उद्योजक म्हणून आपण चर्चा करणे गरजेचे आहे. जिथे आपल्याला वाटेल तिथे हरकत देखील नोंदवली पाहिजे. आपल्या उद्योगांवर या धोरणांचा दूरगामी परिणाम होत असेल, तर आपण अशी धोरणे समजून घेऊन त्यावर चर्चा करणे अपेक्षित आहे. मात्र हे होताना दिसत नाही. उद्योजकांनी ही अनास्था हटवणे गरजेचे आहे. यासाठीच उद्योग आघाडी काम करत आहे. उद्योजकांनी एखादे धोरण समजून घेऊन त्याबाबतचे सजेशन – रिजेक्शन निर्णय प्रक्रिया होईपर्यंत पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीची स्थापना ही उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच करण्यात आली असल्याचे सांगून पेशकार पुढे म्हणाले प्रत्येक जिल्ह्यात आत्मनिर्भर भारत टास्क फोर्स बनवण्याचे काम सुरू आहे. उद्योगांना किंवा उद्योजकांना आलेले प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय जनता पक्ष उद्योजकांना मदत करण्याच्या भूमिकेत असून, कुठलीही अडचण आली तरी त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहतो असेही ते म्हणाले.
प्रदीप पेशकार यांनी मेक इन इंडिया, आत्मनिर्भर म्हणजे काय, शासकीय योजना व त्यांची अंमलबजावणी, उद्योगांनी स्वतः सक्षम होऊन रोजगारनिर्मितीची गरज असल्याचे सांगून याबद्दल माहिती दिली. सेवा उद्योग वैशिष्ट्ये व उद्योगसंधी तसेच आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत येणाऱ्या शासकीय योजनेसंदर्भात मार्गदर्शन केले. सर्व उद्योजकांना आपल्या उद्योगांसाठी ई-गर्व्हनंन्स मॅनेजर नेमावा जेणे करून शासनाच्या योजनांची माहिती वेळेत व अमंलबजावणी सुरळीत होऊ शकेल असेही पेशकार यांनी यावेळी सांगितले.
उद्योजक आणि उद्योग करणारे असे दोन प्रकार पाहायला मिळतात. आपण उद्योजक आहोत आपल्याला उद्योग करणार्यांपासून सावध राहिले आहे आणि ही सतर्कता उद्योग आघाडी आपल्याला मिळवून देते असेही पेशकार यांनी सांगितले.उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष निखिल काळकुटे यांनी पिंपरी-चिंचवड औद्योगिक शहर बाबत माहिती दिली तसेच कार्यक्रमाचे आभार मानले.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा सेवा उद्योगांवर परिणाम..
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा सेवा उद्योगांवर मोठा परिणाम झाला असून, यापुढील काळात कोणत्याही सेवा क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे महत्व वाढणार आहे. 2001 ते 2020 या कालावधीचा अभ्यास केला असता, गेल्या काही वर्षात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वाढलेला वापर लक्षात घेऊन सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांनी या गोष्टींचा वापर करण्यास, त्याची हाताळणी करण्यास आता शिकले पाहिजे असा सूर या परिसंवादातील होता