‘उबाठा’ म्हणजे ‘शोले’तील हतबल ठाकूर का जेलर ?

आज ५० वर्षे झाली तरी ‘शोले’ चित्रपट मात्र एव्हरग्रीन ठरला आहे. चित्रपटाची कथा, त्यातील एक एक पात्र आणि त्यात अचूकपणे शोधलेली अभिनेते मंडळी..फारच छान ! सलीम-जावेद यांचे संवाद आणि अधून मधून पडद्यावर दाखवल्या गेलेल्या हेमामालिनी आणि जया भादुरी अगदी चपखल वाटतात !
सूडाने पेटलेला ठाकूर..
आज उबाठा गटाची अवस्था हतबलतेच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. घरातील सर्वांना एका गुंडाने ठार केल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी सूडाने पेटलेला ठाकूर म्हणजे संजीव कुमार.. हात तुटलेले असल्यामुळे स्वतः काही करू शकत नाही, मग तो भाडोत्री गुंड नेमतो. मूळ शिवसेना फुटल्यानंतर अक्षरशः सूडाने पेटलेल्या उद्धव ठाकरे यांना मात्र असे कोणी भेटलेले नाही..जे भेटले त्यांनी आणखी गाळात घातले !
कॉमेडियन जेलरशी तुलना..
अनेक व्यंगचित्रकार उद्धव ठाकरे यांची तुलना ‘शोले’ मधील कॉमेडियन जेलर म्हणजे असरानीबरोबर करतात. दरवेळी तो पायरीवरून धडपडतो.. निम्मे या दिशेने जा..निम्मे या दिशेने जा..असे म्हणत शेवटी एकटाच राहतो ! विनोदाचा भाग सोडला, तर ठाकूर म्हणा किंवा जेलर म्हणा, दोघेही हतबल दाखवलेले आहेत.
रोज नवीन खिंडार, उभारी कधी ?
‘हम अंग्रेजोंके जमानेके जेलर है।’ असे म्हणत असरानी रोज जगत असतो आणि भूतकाळातून बाहेर येत नसतो. तशी अवस्था आज उबाठा गटाची झाली आहे. निवडणुका घ्या, मग ताकद दाखवतो. खोके, बोके, गद्दार, खंजीर, वार या मर्यादित शब्दसाठ्याच्या बाहेर हा गट पडत नाही. वडील चोरले, पक्ष चोरला, चिन्ह चोरले, असे रोज रोज बोलून मते मिळत नाहीत, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. तरी प्रत्येक सभेच्या वेळी असरानीप्रमाणे धडपडण्याची प्रक्रिया सुरूच आहे. त्यांच्या पक्षाला रोज खिंडार पडत आहे, आणि कार्यकर्तेसुद्धा सोडून जात आहेत. दृष्टिहीन, अकुशल नेतृत्व, वडिलांची पुण्याई आणि सभोवताली फिरणारे स्तुतीपाठक यातून सावरल्यानंतर ‘आऊटगोईंग’ चा प्रवाह थांबणार आहे !
हा, गेला..जाऊ दे, तो चोरच होता !
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उबाठा गटातून बाहेर पडलेल्याची निर्भत्सना करणे, हा मूलमंत्र अंगलट आलेला आहे. गेलेला चोर होता, भ्रष्ट होता, त्याची फाईल भाजपाने काढून त्याला ‘ब्लॅकमेल’ केले, असा हवेत गोळीबार करत करत पक्ष संपत आला आहे, हे उद्धव ठाकरेंना कधी समजणार ? बरं जे गेले त्यांचे काहीही वाईट झाले नाही.. उलट एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात जनतेने ६० आमदार टाकले, तरी शुद्ध येत नाही !
सुषमा अंधारे सुद्धा निघाल्या…
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ त्यांच्या गटाशी एकनिष्ठ असलेल्या सुषमा अंधारे या सुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. तथ्य किती आहे माहीत नाही, पण हे घडू शकते !
हेही वाचा : उडणार इलेक्शनचा धुरळा!
अंधारे – दमानिया यांची नळावरील भांडणे..
यानंतर मजेशीर बाब म्हणजे सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया या दोघींची नळावरील भांडणे सुरू झाली आहेत. पुन्हा एकदा हिंदी डायलॉग..जिनके घर शीशेके होते है, वो दुसरोंपर पत्थर फेका नहीं करते..किंवा चोर चोराच्या घरी चोरी करत नाही..कोण कोणाकडून सुपारी घेते आणि कोण किती पक्ष फिरून आले..याचा पाढा सुरू झाला आहे. चिखलात कितीही दगड टाकले, तरी चिखलच उडणार !
सूडनाट्य उद्धव यांना झेपेल का?
संजीवकुमार बदला घेतो, उद्धव यांना विरोधकांचा संजीव कुमार पद्धतीने बदला घेण्यासाठी शक्य होणार नाही. कारण सिनेमात संजीवकुमारची चूक नसते आणि उद्धव यांची पावलोपावली झालेली चूक त्यांना यापुढे मान वर काढू देईल,असे दूरदूरपर्यंत अजिबात वाटत नाही. बहुसंख्य त्यांना सोडून गेले. आणखी काही जातील आणि शेवटी स्वतः उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे,आदित्य ठाकरे आणि एखाद वेळेस संजय राऊत हे त्या गटात शिल्लक राहतील, असे चित्र आहे.
सुषमा अंधारे यांची भूमिका..
एकेकाळी हिंदू देवतांना, एवढेच काय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अगदी खालच्या पातळीवरील शिव्या देणाऱ्या सुषमा अंधारे यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षात का घेतले, हा अनुत्तरीत प्रश्न आहे. पण, विरोधकांवर खालच्या थरावरील टीका करण्यासाठी सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातो, हे प्रत्येकाला समजते. फक्त त्यामुळे आपलाच पक्ष गाळात चालला आहे आणि आपण पायावर दगड पाडत आहोत, हे उबाठा गटाला समजत नाही, हे सगळ्यात मोठे दुर्दैव !
सुषमा अंधारे यांच्या कोलांटउड्या..
उद्धव यांच्या शिवसेनेत जाण्यापूर्वी नाही म्हणायला अगदी मनापासून सुषमा यांना त्यावेळेच्या एकसंघ राष्ट्रवादीत जायचे होते. पण, सुषमा यांच्या प्रवेशाला विरोध करत थेट शरद पवारांना घेऊ नका, असे सांगितले गेले. ज्यात स्वतः अजित पवार होते! आज राजकीय परिस्थिती एवढी अचानक बदलली आहे, की आता त्याच अजितदादांना सुषमा आपल्या राष्ट्रवादीत हव्या आहेत, त्या दोघांचे त्यादृष्टीने बोलणे व भेटीगाठी सुरु आहेत.
अंधारे यांच्या पाठोपाठ चतुर्वेदी ?
कोणत्याही क्षणी अंधारे यांचे पक्षांतर आणि राष्ट्रवादी पक्ष प्रवेश हे नक्की झालेले आहे. आधी सुषमा अंधारे आणि नंतर प्रियांका चतुर्वेदी की दोघी एकमेकांचे हात धरून एकाचवेळी दादांकडे धावतात.. बघू या नेमक्या राजकीय हालचाली आणि घडामोडी कोणत्या दिशेने वाटचाल करणार आहेत !
‘शोले’ चा शेवट बदलणार..
ज्या पद्धतीने उबाठा गटाला गळती सुरू झाली आहे, त्यावरून ठाकूर यांच्यावतीने सूड घेण्यासाठी कोणीच उरलेले नाही, हे निश्चित ! राजकारणात तिकडे ‘महायुती’ अतिशय बलशाली होत चालली आहे आणि ज्या जय-वीरू चा म्हणजेच नाना पटोले आणि शरद पवार यांचा आधार उबाठा गटाने घेतला होता, त्यांचे पक्षही रसातळाला चालले आहेत.. ठाकूर यांच्या वतीने ते कधी सूड घेणार? ‘शोले’ तील या सूड नाट्याचा शेवट ठाकूर एकाकी पडण्यातच होणार आहे, सांगायला कोणा ज्योतिषाची मुळीच गरज नाही !