अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडी

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने

भगवंताला शरण जावे.

मी जे जे करतो ते ते भगवंताकरता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते. भगवंतप्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे, हे भक्ताचे लक्षण आहे. चांगले कार्य हेसुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते; याकरिता, कोणतेही कृत्य भगवंताला स्मरून करावे. भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसे म्हणावे ? जो काळ भगवत्स्मरणात जातो, तोच काळ सुखात जातो. विषयासाठी आपण स्वत:ला विसरतो, मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वत:ला विसरू ? मला सगुणांत प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते, तोपर्यंत सगुणभक्ती करावी. गुरूच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो, म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली ? यामध्ये अभिमान अनासाये मारला जातो. मीपणा टाकल्याशिवाय गुरुआज्ञा नाही पाळता येत. गुरुआज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरीसुद्धा ती आपले डोके मधूनमधून वर काढतेच. पण तिला एकदा कळले की हा ऐकत नाही, की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते. देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली, तरी गुरुआज्ञा मोडू नये. देहातीत व्हायला, गुरुआज्ञेप्रमाणे वागणे यापरते दुसरे काय आहे ? ‘ मी देही नाही ’ असे म्हणत राहिला, तर माणूस केव्हातरी देहातीत होईल.

हेही वाचा – बंगाली जनतेने सिंदूरची ताकद दाखवून द्यावी; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

आपला धर्म आणि नीती सांभाळावी, आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा. संत आणि प्रापंचिक, दोघेही प्रपंच करतात; पण प्रापंचिक, कर्तेपणा आपल्याकडे घेतात, तर संत ‘ राम कर्ता ’ असे म्हणून प्रपंच करतात. कर्तेपण तुम्ही आपल्याकडे घेतलेत तर सुखदु:ख भोगावे लागेल. बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वत:ला विसरतो, मग भगवंताकरिता नाही का तसे करता येणार ? तळमळ असली पाहिजे की मग सर्व काही होते. ‘ किती दिवसांत मुक्ती मिळेल ? ’ याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे. : ‘ ज्या क्षणी भगवंतस्मरणात स्वत:ला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल. ’ स्वत:ला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे. कृती करणाऱ्याचाच वेदान्त खरा असतो. मी विद्वान् आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते. याकरिता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा. सहवासाने माणसाचेसुद्धा प्रेम जर वाढते, तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचे प्रेम नाही का येणार ? भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे, यातच सर्व धर्माचे आणि शास्त्रांचे सार आहे.

बोधवचन:- देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत, म्हणून नाम घेत, तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा. जे कशानेही साधले नाही ते नामाने साधेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button