पत्रकार हत्या प्रकरणात राम रहीम निर्दोष; जन्मठेपेची शिक्षा रद्द

Gurmeet Ram Rahim Singh | गुरमीत राम रहीम सिंग याला २००२ मधील पत्रकार हत्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने शनिवारी पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी त्याला निर्दोष मुक्त केले. यापूर्वी विशेष सीबीआय न्यायालयाने राम रहीम याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
२०१९ मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने गुरमीत राम रहीम सिंग, कुलदीप सिंग, निर्मल सिंग आणि कृष्ण लाल यांना सिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानंतर या निर्णयाला राम रहीमने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने सुनावणी करताना खटल्यातील शिक्षा रद्द करत सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले.
हेही वाचा : भारत-न्यूझीलंड फायनल रद्द झाल्यास चॅम्पियन कोण? ICC चा नियम काय सांगतो
नेमके प्रकरण काय?
पत्रकार रामचंद्र छत्रपती ‘पूरा सच’ हे वृत्तपत्र चालवत होते. ऑक्टोबर २००२ मध्ये हरियाणातील सिरसा येथे त्यांच्या घराबाहेर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या वृत्तपत्रात डेरा सच्चा सौदा मुख्यालयात महिला अनुयायांचे लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप करणारे निनावी पत्र प्रकाशित झाले होते. त्यानंतर हा हल्ला झाल्याचा आरोप होता.
राम रहीम यांचे वकील जितेंद्र खुराणा यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाने खून प्रकरणातील शिक्षा रद्द केली असून राम रहीम यांना निर्दोष मुक्त केले आहे.
दरम्यान, या प्रकरणातून मुक्तता मिळाली असली तरी राम रहीम याला २०१७ मध्ये दोन महिला शिष्यांवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणात त्याला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून त्याला हरियाणातील रोहतक येथील सुनारिया तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
२०१७ पासून आतापर्यंत त्याला १४ वेळा पॅरोलही देण्यात आली आहे. सिरसा येथे मुख्यालय असलेल्या डेरा सच्चा सौदा संघटनेचे हरियाणा, पंजाब, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये मोठ्या संख्येने अनुयायी आहेत.





