नागपूर जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी ‘अक्षरा मंच’ उपक्रमाचा शुभारंभ
बालविवाह रोखण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न

नागपूर : बालविवाहाचे दुष्परिणाम लक्षात घेता यापुढे जिल्ह्यातील एकाही गावात बालविवाह होणार नाही, यासाठी जिल्हा परिषदेचा महिला व बालविकास विभाग पुढे सरसावला आहे. गावागावांत किशोरवयीन मुलींचे अक्षरा मंच स्थापन करण्यात आले आहेत.
बालविवाह रोखण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधून जामगड तालुका काटोल या गावातून या मिशनचा शुभारंभ करण्यात आला. एकीकडे मुलींचा जन्मदर कमी होत असताना दुसरीकडे काही भागात आजही बालविवाह होतात. बालविवाहाबाबत जनजागृती करूनही काही पालक वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून बाल विवाह करतात.
हे थांबवण्यासाठी गावागावात अक्षरा मंचाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सात ते अकरा मुलींचा एक मंच तयार करण्यात आला आहे. यामध्ये वेगवेगळ्या समूहातील मुलींना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. बालविवाहाची चाहूल लागताच हा मंच पालकांचे समुपदेशन करेल. त्यामुळे ते आपल्या मुलींचा बालविवाह करणार नाहीत.
हेही वाचा : प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल जाहीर; राज्यात ९१.८८ टक्के निकाल
तरीसुद्धा केल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करणे सोयीचे होईल, म्हणून अशा प्रकारचे मंच गावागावात स्थापन करण्यात आले आहेत. मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांना सक्षम करणे, बाल विवाहामुळे होणाऱ्या दुष्परिणामांना आळा बसावा असे या अक्षरा मंचाचे मुख्य उद्देश असून महिला बाल विकास विभाग यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे गावातील अक्षरा मंचला सर्व पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे सीईओ विनायक महामुनी यांनी केले आहे.
जामगड येथून अभिनयाला प्रारंभ
अक्षरा मंच या अभियानाचा प्रारंभ जामगड येथून करण्यात आला. कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा महिला व बाल अधिकारी रणजित कुऱ्हे यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी बाल विकास प्रकल्प अधिकारी सतीश तट्टे , कोंढाळीचे पोलिस उपनिरीक्षक त्रिपाठी, सरपंच चव्हाण,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दिशा राऊत यांनी केले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
बालविवाह ही समाजाला लागलेली कीड असून ती संपवण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन आपल्या गावातील बालविवाह रोखला पाहिजे. तेव्हा नागपूर जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा म्हणून निश्र्चितच पटलावर येईल असा मला विश्वास आहे.
-विनायक महामुनी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर.