दिवाळीच्या तोंडावर खाद्य तेलाच्या दरात वाढ, सर्वसामान्यांचा खिसा रिकामा
दिवाळीनंतर खाद्य तेलाच्या दरात प्रतिकिलो २० ते ३० रुपयांची घसरण
नागपूर : क्रूड आणि रिफाइंड पाम तेल, सोयाबीन तेल आणि सनफ्लॉवर सीड तेल यांवर बेसिक कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. त्यामुळेच दिवाळीच्या तोंडावर खाद्य तेलाच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचा खिसा रिकामा झालेला आहे. दिवाळीतील या भाववाढीने अनेकांचे बजेट बिघडले आहे. असे असले तरी दिवाळीनंतर खाद्य तेलाच्या दरात प्रतिकिलो २०ते ३० रुपयांची घसरण होणार आहे.
भारतात फक्त चाळीस टक्के खाद्य तेलाची निर्मिती होती. ६५ टक्के खाद्य तेलाची आयात करण्यात येते. भारतात खाद्य तेलाचे उत्पादन वाढावे म्हणून केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी ११ हजार ४० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केलेली आहे.
शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांची वेळेवर उपलब्धता करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यात पामतेलाचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न आहे. हे अयोग्य आहे. ही बाब केंद्र सरकारपुढे मांडलेली आहे.
भारतात पूर्वी कधीही पामतेल, सोयाबीन तेलाचा वापर केला जात नव्हता.
मात्र, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सरकारवर दबाव आणून व काही डॉक्टरांनीही शेंगदाणे, सरसो आणि मोहरीचे तेल आरोग्यासाठी चांगले नसल्याबद्दल सांगत होते. त्यामुळेच भारतातील तेलबियांपासून निघणाऱ्या खाद्य तेलाची मागणी कमी झाली. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हाच डाव साधत भारतात सोयाबीन, पाम तेलाचा व्यापार वाढविला आहे. स्वस्त तेल म्हणून सोयाबीनचा वापर वाढला आहे.
परिणामी, भारतातील तेल बियांची मागणी कमी झाल्याने त्याचे उत्पादन कमी झालेले आहे. त्याचा फायदा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी घेतला, भारतात ६५ टक्के पाम, सोयाबीन तेलाची आयात होत आहे. परिणामी, विदेशात मोठ्या प्रमाणात पैसा जात आहे. विदेशींच्या हातात खाद्य तेलाचे भाव सापडले आहेत. त्यामुळेच देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे शंकर ठक्कर म्हणाले.
दिवाळीच्या तोंडावर खाद्य तेल महागले आहे. हे बरोबर आहे. या भाववाढीमध्येही बहुराष्ट्रीय कंपन्यांचा हात आहे. आयात शुल्क वाढणार असल्याने अनेक कंपन्यांनी नेपाळ आणि सार्क देशातील प्लान्टमध्ये तेल आयात करून ठेवलेले आहे. ते आता व्यापारी करारानुसार कोणताही आयात शुल्क न लावता तेल भारतात आणले जात आहे. त्यामुळे ग्राहकांचा खिसा हलका होत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या मात्र, मालामाल होत आहे. दिवाळीनंतर खाद्य तेलाची मागणी कमी होईल. खाद्यबियांही बाजारात येणार आहे. त्यामुळे खाद्य तेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
– शंकर ठक्कर, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघ





