ताज्या घडामोडीमुंबई
लससक्तीचा निर्णय माजी मुख्य कार्यकारिणीच्या बैठकीशिवाय; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
मुंबई | लोकल प्रवासासाठी लस सक्तीचा निर्णय माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी करोनाशी संबंधित आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर कार्यकारी समितीची बैठक न बोलवता घेतला. करोनाचा वाढता संसर्ग व नागरिकांचे जीव जात असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला, असे राज्य सरकारतर्फे शुक्रवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आले. मात्र अशी कोणती आणीबाणी होती, ज्यामुळे तल्कालिन मुख्य सचिवांना कार्यकारिणीच्या बैठकीविना हा निर्णय घेण्यास आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना कात्री लावण्यास भाग पाडले, असा प्रश्न न्यायालयाने केला. तसेच लससक्तीबाबत आतापर्यंत घालण्यात आलेल्या सगळय़ा निर्बधांबाबतची कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले. लोकल प्रवासासाठी लससक्ती करण्याच्या १५ जुले, १० आणि ११ ऑगस्ट २०२१च्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.