पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर, पाच गावांचा संपर्क तुटला; नागरिकांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास, यंत्रणा कधी सुधारणार?
परभणी: पालम तालुक्यातील लेंडी नदीला पाणी आल्याने पुयणी गावाशेजारील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे पाच गावांचा पालमशी संपर्क तुटला आहे. गुरुवारी रात्रीपासून परभणी जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिकांच्या नुकसान होण्याची भीती आहे. मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सकाळी ही रिमझिम पावसाची हजेरी जिल्हाभरात सुरूच आहे.
बालाघाट डोंगरभागात पाऊस पडल्याने लेंडी नदीला पूर आला. हे पाणी पुयणी गावाशेजारील खुज्जा पुलावरून वाहत असल्याने या भागातील ५ गावांचा संपर्क तुटला होता. त्यात पुयणी, आडगाव, तेलजापूर, वनभूजवाडी, गणेशवाडी गावांचा समावेश आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने पाच गावातील नागरिक अडकून पडले होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
पुलावरून पाणी वाहत असताना देखील नागरिकांनी जीवाची पर्वा न करता पाण्यामधून वाट काढली. काही नागरिकांनी धाडस करत आपल्या दुचाकी पुलावरून वाहत असलेल्या पाण्यातून घातल्या. वहिनी नदीवरील पुलाची उंची कमी असल्यामुळे पाच गावांचा संपर्क नेहमीच तुटतो त्यामुळे वारंवार पुलाची उंची वाढवून द्यावी अशी मागणी ग्रामस्थातून केली जाते मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी अंतर मशागतीची कामे सुरु केली आहेत. काही ठिकाणी खत घालणे, कोळपणी करणे तसेच पिकांवर फवारणी सुरु आहे. तसेच काही तालुक्यातील नदी नाल्यांनाही या पावसामुळे पाणी आले आहे. तर धरण क्षेत्रातही उपयुक्त पाणीसाठ्यामध्ये किंचतशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत या पावसामुळे शेतकऱ्यांत समाधान आहे.