मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या इच्छाशक्तीचा अभाव – उदयनराजे
मुंबई – मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या इच्छाशक्तीचा अभाव आहे, अशी जाहीर टीका भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. दरम्यान, केंद्रीय विधी मंत्री रविशंकर प्रसाद यांचीही सह्याद्रीमधील ऑनलाईन बैठकीला दांडी मारल्याचे दिसून आले आहे. आज मुंबईत मराठा आरक्षणासंदर्भात बैठक झाली. विरोधी पक्षनेत्यांसह सत्ताधारी नेते बैठकीला उपस्थित होते. तामिळनाडूत जे शक्य झाले ते महाराष्ट्रात का नाही? असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात इच्छाशक्तीचा अभाव आहे, असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर यावेळी त्यांनी हल्लाबोल केला आहे. राज्यतील सत्ताधारी नेत्यांमध्येही इच्छाशक्ती दिसून येत नाही, असे उदयनराजे भोसले म्हणाले. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारची भूमिका मांडली. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. विरोधकांनी पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारने श्वेत पत्रिका जाहीर करावी. या मुद्द्यावर सरकारकडून काय प्रयत्न सुरु आहेत, हे जनेतेला समजले पाहिजे. मराठा आरक्षणाची स्थिती काय आहे, काय चाललंय आणि काय नाही, हे सांगायला हवे, असे उदयनराजे भोसले म्हणाले. मराठा समाजाच्या विकासाठी स्थापन केलेल्या सारथी सारख्या संस्था अखेरची घटका मोजत आहेत, असे सांगत उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारवर टीका केली.