किरीट सोमय्या यांचे विश्वास नांगरे पाटलांच्या पत्नीवर ‘हे’ गंभीर आरोप, नोकरीतून मुक्त करण्याची मागणी
मुंबई |
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईचे संयुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केलेत. तसेच विश्वास पाटील यांना पोलीस दलाच्या नोकरीतून मुक्त करा, अशी मागणी केलीय. ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते. किरीट सोमय्या म्हणाले, “जालना साखर कारखान्याचे दुसऱ्या भागीदार रुपाली विश्वास पाटील या आहेत. विश्वास नांगरे पाटील हे मुबंई पोलीस दलाचे संयुक्त आयुक्त आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.
नांगरे पाटील यांना नोकरीतून मुक्त केलं पाहिजे.” “शरद पवार यांनी दिलेली धमकी ही अनिल देशमुख की अजित पवार यांच्यामुळे? देशमुखांवर प्रेम आहे की अजित पवार यांची काळजी आहे?” असा खोचक सवालही किरीट सोमय्या यांनी यावेळी केला. ठाकरे सरकारने जनतेला लुटलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे दुप्पट रुग्ण मयत झाले आहेत. तेव्हा ठाकरे सरकार हे पैसे मोजत होते. घोटाळेबाजांना शिक्षा झाली पाहिजे, असंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
- “दिवाळीनंतर ३ मंत्री आणि ३ जावयांचे फटाके फोडणार”
दरम्यान, किरीट सोमय्या म्हणाले होते, “सध्या दिवाळी सण येतोय, दिवाळीत फटाके फोडतात. मात्र, किरीट सोमय्या दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. एक, दोन, तीन, चार किंवा पाच नाही तर पूर्ण अर्धा डझन लोकांचे फटाके फोडणार आहे. घोटाळेबाज ठाकरे-पवारांनी १२ दिवस नाटकं केली. यात ३ मंत्र्यांच्या ३ घोटाळ्यांचा आणि त्यांच्या ३ जावयांचा समावेश आहे. ठाकरे सरकारमध्ये जावयांचं राज्य आहे. अजित पवार यांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. हसन मुश्रीफांनी त्यांच्या जावयाला आणि नवाब मलिकांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. एकदम बॉम्ब फोडण्याचं काम किरीट सोमय्या करणार आहे. यांनी केवळ लवंगी फटाके फोडले.”