कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार, राष्ट्रवादीचा नारा
कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची प्रभाग स्तरावर तयारी सुरु झाली. राष्ट्रवादी स्वबळावर या निवडणूक लढविण्याचा नारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिला. आमची भूमिका स्वबळाची आहे. प्रत्येक प्रभागातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु आहे. पुढचा निर्णय पक्ष श्रेष्ठी घेणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. याआधी काँग्रेसनेही या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला होता.
दरम्यान, या महापालिका निवडणुका जवळ आल्याने प्रत्येक पक्ष सक्रिय झाला असून राष्ट्रवादीही मोठ्या तयारीनिशी मैदानात उतरली आहे. २००५ साली कल्याण-डोंबिवली महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. मात्र त्यानंतर पक्षातील अंतर्गत वादामुळे राष्ट्रवादीची पीछेहाट झाली. मात्र आगामी निवडणुकीत २००५ची पुनरावृत्ती करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी फायरब्रॅन्ड नेते जितेंद्र आव्हाडांवर मोठी जबाबदारी सोपवली. २००५ मध्ये २५ तर २०१० मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे १४ नगरसेवक निवडून आले होते. २००५ मध्ये अप्पा शिंदे यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकाळात राष्ट्रवादीचा महापौर पहिल्यांदा कल्याण डोंबिवली महापालिकेत विराजमान झाला होता.