प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बनंतर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सांगली – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यात राजकीय खळबळ माजली आहे. महाविकास आघाडीमुळे शिवसेना कमकुवत होत असल्याचा दावा प्रताप सरनाईक यांनी केला आहे. इतकंच नाही तर भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. सरनाईक यांनी पत्र लिहिलं असलं तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठल्याही प्रकारचं वितुष्ट येणार नाही, असा दावा पाटील यांनी केलाय. ते सांगलीमध्ये माध्यमांशी बोलत होते.
“मला वाटत नाही की त्यांचा तो भाव असेल. शिवसेनेतून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत कुणी गेलंय, असं आता काही झालेलं नाही. त्यामुळे अशापद्धतीनं कोणत्याही परिस्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत वितुष्ट निर्माण होईलं असं मला वाटत नाही. ज्यांनी पत्र लिहिलं आहे, त्यांच्या मतदारसंघात असं काही झालं आहे का हे तपासून पाहावं लागेल”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा प्रताप सरनाईक यांचा आरोप जयंत पाटील यांनी फेटाळून लावल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनापासून आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढतील अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.