लढण्यापूर्वीच छत्रपतींवर माघार घेण्याची वेळ, पण निवडणुकीपूर्वी राजेंचा राजकारण्यांना इशारा
कोल्हापूर : राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार म्हणून घोषणा करत भाजप आणि शिवसेनेची कोंडी करणाऱ्या संभाजीराजेंची याच पक्षांनी कोंडी केल्यानेच लढण्यापूर्वीच माघार घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आमदारांकडून न मिळालेला प्रतिसाद, शिवसेनेची अट आणि एकदा तोंड भाजलेल्या भाजपकडून झालेले दुर्लक्ष यामुळे राज्यसभेचा किल्ल्ला सर करण्याची शक्यता मावळल्यानेच मैदानातून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा करावी लागणार आहे. तसे करताना हा निर्णय सन्मानजनक वाटावा, यासाठी ‘आता राज्यसभा नव्हे, राज्यच घेणार आणि त्यासाठी स्वराज्य संघटना बळकट करणार’ अशी घोषणा करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपसाठी हा इशारा मानण्यात येतोय.
संभाजीराजे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. मराठा संघटनांचा त्यांना असलेला पाठिंबा, विदर्भ आणि मराठवाडा या भागात त्यांची तयार झालेली जनप्रतिमा आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना आलेल्या राजकीय महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही घोषणा म्हणजे शिवसेना आणि भाजपची कोंडीच मानली जात होती. यामुळे दोन्ही पैकी एक पक्ष अथवा महाविकास आघाडी आपल्याला मदत करेल असा विश्वास त्यांना वाटत होता. मराठा व्होट बँकेच्या जोरावर महाविकास आघाडी अथवा शिवसेना पुरस्कृत उमेदवारी मिळेल, भाजप त्याला विरोध न करता पाठिंबा देईल हा त्यांचा विश्वास आठ दिवसातच मावळला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधण्याची घातलेली अट आणि नंतर शरद पवारांपासून ते काँग्रेसच्या नेत्यांपर्यंत सर्वांनीच फारसा हस्तक्षेप न करण्याची भूमिका यामुळे संभाजीराजे एकाकी पडले.
संभाजीराजे भाजपच्या शिफारशीने राष्ट्रपती नियुक्त खासदार झाले. पण त्यांचा सहा वर्षात पक्षाला काहीच फायदा झाला नाही. शिवाय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या संघर्षाने त्यांच्याबाबतची नाराजी वाढली. अशावेळी भाजप मदत करेल ही शक्यता देखील मावळली. दुसरीकडे भाजपचा हा अनुभव लक्षात घेऊन ‘सेनेत या मगच उमेदवारी’ ही अट घालण्यात आली. पुरस्कृत करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. याचवेळी संजय पवार या सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देत संभाजीराजेंना शह दिला. यामुळे ज्यांच्यावर भरवसा होता, त्यांनीच अटी घालत हात वर केल्याने संभाजीराजेंच्या ‘वाटेत काटे’ पेरले गेले. हे काटे काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला खरा पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
राज्यसभेवर खासदार होण्यासाठी ४२ मते लागतात. अर्ज भरायला दहा आमदारांच्या सह्या लागतात. छत्रपतींसाठी केवळ एक-दोन आमदारांपुढे हा आकडा गेला नाही. अनुमोदक मिळायला एवढया अडचणी आल्या तर निवडून येण्यास किती? याचा अंदाज त्यांना आला. यातून लढाईच्या मैदानातच न उतरण्याची मानसिकता तयार झाली.
आता संघटना बळकट करणार
राज्यसभा नव्हे राज्यच ताब्यात घेणार अशी घोषणा संभाजीराजेंच्या समर्थकांनी केली आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटना बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. शुक्रवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘तुमच्या नजरेतलं स्वराज्य घडवायचं आहे, मी कटिबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी, मी बांधील असेन तो फक्त जनतेशी’,असे ट्विट संभाजीराजेंनी केले आहे. यावरून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट होते.